Join us  

Coronavirus : ... म्हणून मी लॉकडाऊन वाढवला, उद्धव ठाकरेंची नागरिकांना भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 9:02 PM

महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना मला सांगायचं आहे, तुम्ही आत्तापर्यंत सरकारचं ऐकून महाराष्ट्र सुरक्षित ठेवला. आता, ग्रीनझोनमधील तरुणांना माझं आवाहन आहे

मुंबई - देशात आणि महाराष्ट्रात लॉकडाऊनचा चौथा टप्पा आजपासून सुरु झाला आहे. त्यातच, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनीही आजच आपल्या आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर, पहिल्यांदाच ते राज्यातील जनतेला संबोधित करत आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा ९० हजारांच्यावर गेला आहे. तर, राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या ३० हजार पार झाली आहे. त्यामुळे, महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन घोषित करत ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. आता, लॉकडाऊन वाढले असले तरी, आपण ग्रीन झोनमध्ये उद्योग सुरु करत आहोत. आत्तापर्यंत, राज्यात ५० हजार उद्योग सुरु झाले असून ६५ हजार उद्योगांना परवानगी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच, महाराष्ट्राला वाचावचंय म्हणून मी लॉकडाऊन वाढवल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.  

महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना मला सांगायचं आहे, तुम्ही आत्तापर्यंत सरकारचं ऐकून महाराष्ट्र सुरक्षित ठेवला. आता, ग्रीनझोनमधील तरुणांना माझं आवाहन आहे. तरुणांनी उद्योग सुरु करण्यासाठी, उद्योगांना बळ देण्यासाठी पुढं यायला हवं, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मोदींजींच्या भाषेत सांगायचं झाला तर, आत्मनिर्भर व्हायचं आहे, असे म्हणत राज्यातील तरुणांना पुढे येण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. कोरोना रुग्णांवर लवकर उपचार झाल्यास ते बरे होऊन घरी परतत आहेत. राज्यात १९ हजार ९०० पर्यंत रुग्ण असले तरी ५००० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होत आहेत ही चांगली बाब आहे. मात्र, आपण काळजी ्घ्यायलाच हवी. मी टीकेचा धनी होईल, महाराष्ट्राला वाचविण्यासाठी मी वाईटपणा घ्यायला तयार आहे. मात्र, भविष्यातील धोका ओळखून मी हा लॉकडाऊन वाढवला आहे. अमेरिका, इटली, ब्राझील, ब्रिटन या देशांमधील परिस्थिती आपण पाहत आहोत. मला महाराष्ट्रात ती परिस्थिती उद्भवू द्यायची नाही. त्यामुळे, मी लॉकडाऊन वाढवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

रेडझोनमध्ये मी उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देत नाही. कारण, मी परवानगी दिली, चला सगळा लॉकडाऊन उठवला. पण, त्यानंतर जर हा प्रादुर्भाव वाढला, तर सुरु होणाऱ्या अघोषित लॉकडाऊनची कल्पना केल्यावरही अंगावर काटाच येतो, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. त्यामुळे केवळ ग्रीन झोनमधील उद्योगांना परवानगी देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, ते विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद या सभागृहाचा सभासद म्हणून निवडून येणे आवश्यक होते. त्यामुळे आज आमदारकीची शपथ घेतल्याने त्यांचे मुख्यमंत्री आता स्थिर झाले आहे. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी आज जनेतशी संवाद साधला. कोरोनाच्या संकटामुळे, लॉकडाऊनमुळे तुम्ही त्रस्त आहात, हे मला माहित आहे. पण, ते गरजचं असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमुख्यमंत्रीमुंबईकोरोना वायरस बातम्या