Join us  

अमितच्या लग्नानंतरही राज ठाकरेंकडे लगीनघाई, ५०० गरीबांचं लग्न लावणार मनसे  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 3:27 PM

पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, मजूर आणि आदिवासी भागातील 500 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पालघर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. फॅशन डिझायनर मिताली बोरूडे हिच्याशी अमित यांनी लग्नाची गाठ बांधली. ठाकरे कुटुंबीयांच्या या लग्नसोहळ्याला दिग्गज नेत्यांनी गर्दी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे, यांसह बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेतेही येथे हजर होते. आता, अमितच्या लग्नानंतरही राज यांच्या घरी लगीनघाई असल्याचे दिसून येते. कारण, राज ठाकरे 500 आदिवासी मुला-मुलींच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार असून मनसेकडून हा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे.  

पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, मजूर आणि आदिवासी भागातील 500 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली असून शेतकऱ्यांची मनसे, कामगारांची मनसे असेही ट्विटरवर लिहिले आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील खैरपाडा मैदानात हा सामुदायिक विवाहसोहळा शनिवार 9 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. पालघर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, राजपुत्र अमित ठाकरेंचा विवाहसोहळ 27 जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. या विवाहसोहळ्याची राज्यभर चर्चा रंगली होती.  

 

 

टॅग्स :अमित ठाकरेराज ठाकरेपालघरमनसे