Join us  

Big Breaking: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा; विधानपरिषद निवडणुकीला ECIची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 11:14 AM

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्यात यावी, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली होती.

मुंबई: विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवले होते. याच पत्राचा आधार घेत राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून २४ एप्रिल पासून राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त आहेत. तसंच उद्धव ठाकरे हे दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती राज्यपाल यांनी निवडणुक आयोगाला केली होती. राज्यपालांच्या या विनंतीनंतर निवडणुक आयोगाने राज्यातील विधान परिषच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) महाराष्ट्रातील विधान परिषद (एमएलसी) निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र या  निवडणुकांदरम्यान कोरोनाचा विचार करता सुरक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या या जागा गेल्या २४ एप्रिलपासून रिक्त आहेत. निवडणूक आयोगाने या जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घ्यावी आणि राज्यात निर्माण झालेला मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवावा, अशी विनंती राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. यानंतर निवडणुक आयोगाने विधान परिषदेच्या जागांची निवडणुका घेणयास परवानगी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी येत्या २८ मेपर्यंत विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. कोरोनामुळे राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्रिपद धोक्यात आलं होते. मात्र आता निवडणुक आयोगाने निवडणुका घेण्यास परवानगी दिल्याने उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेनिवडणूकभारतीय निवडणूक आयोगमहाराष्ट्र सरकार