Join us

लॉकडाऊन काळात ४ लाख ७४ हजार जणांचे पोट रेल्वेने भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 18:37 IST

पश्चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीवतीने अन्नदान सुरु

 

मुंबई :  पश्चिम रेल्वेच्या सहा विभागात पश्चिम रेल्वे आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँन्ड कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी ) द्वारे अन्नदान सुरुआहे.  लॉकडाऊनमध्ये ठिकठिकाणी अडकलेल्या मजुर, निराधार दोन वेळच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार रेल्वेच्या मिशन फूड डिस्ट्रिब्युशन मोहिमेची सुरुवात केली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून गरजुंना खिचडीचे वाटप करण्यात येत आहे. २९ मार्चपासून ते ५ मेपर्यंत एकुण ४ लाख ७४ हजार जणांचे पोट भरण्यात आले आहे.

मुंबई सेंट्रल येथील जनजीवन राम रुग्णालय, माटुंगा रोड, चर्नी रोड, आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानक परिसरात ५ मे रोजी दिवसभरात ७ हजार १८८ पाकिटांचे निराधार नागरिकांना वाटप करण्यात आले. आयआरसीटीसीच्या बेस किचनमधून गरजूंना खिचडी देण्यात येत आहे. मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद येथील आयआरसीटीसीच्या बेस किचनमधून ७ हजार १८८ पाकिटांचे निर्मिती केली आहे. मागील ३८ दिवसात ४ लाख ७४ हजार जणांना अन्नदान केली असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. लॉकडाऊन काळात पश्चिम रेल्वेचे वाणिज्य विभागाचे १ हजार ४१६ कर्मचारी अन्नदान करण्याचे काम करत आहेत. यामध्ये आरपीएफचे जवान आणि सामाजिक संस्थाच्या मदतीने पाकिटांचे वाटप केले जात आहे. आयआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वे कोरोनाशी सामना करत आहेत. या कठीण काळात गरजूना मदत केली जात आहे. २९ मार्चपासून येथे आयआरसीटीसीच्या मुंबई सेंट्रल बेस किचन आणि अहमदाबाद बेस किचन अन्नदान केले जात आहे. देशासह संपूर्ण जगात करोना विषाणूचा प्रसार वाढला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे  नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका देशासह राज्यातील बेघर आणि रस्त्यावर राहणाऱ्या  नागरिकांना बसत आहे. त्यामुळे त्यांना अन्नदान करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती पाश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 

 

टॅग्स :अन्नरेल्वे