श्वानकेंद्राबाबत दुटप्पी भूमिका
By Admin | Updated: March 12, 2015 01:10 IST2015-03-12T01:10:39+5:302015-03-12T01:10:39+5:30
श्वान नियंत्रण व निर्बीजीकरण केंद्रासाठी जागा देण्यात महापालिकेला अपयश आले आहे. प्रशासनाने दोन ठिकाणी जागा निश्चित केली होती,

श्वानकेंद्राबाबत दुटप्पी भूमिका
नवी मुंबई : श्वान नियंत्रण व निर्बीजीकरण केंद्रासाठी जागा देण्यात महापालिकेला अपयश आले आहे. प्रशासनाने दोन ठिकाणी जागा निश्चित केली होती, परंतु नगरसेवकांनी प्रस्ताव फेटाळून लावले आहेत. नगरसेवकांच्या दुटप्पी भूमिकेमुळे हा प्रश्न अद्याप मार्गी लागला नसून, आता अपयशाचे खापर प्रशासनाच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
नवी मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महापालिकेकडील उपलब्ध आकडेवारीवरून शहरात रोज ३० ते ३२ नागरिकांना श्वानदंश होत आहे. रात्री ११ नंतर रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. कुत्रे मोटारसायकलचाही पाठलाग करत असून त्यामुळे अपघातही घडले आहेत.
कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पालिकेने पूर्वी कोपरी नाक्यावर श्वान निर्बीजीकरण केंद्र सुरू केले होते. परंतु इमारत मोडकळीस आल्यामुळे नवीन जागेचा शोध सुरू करण्यात आला.
सुरवातीला तुर्भे उड्डाणपुलाखाली हे केंद्र सुरू करण्याचे निश्चित केले होते. महापालिकेने प्रस्तावास मंजुरीही दिली होती. परंतु नंतर काही सामाजिक संस्थांचा विरोध असल्याचे कारण देऊन हे काम थांबविण्यात आले.
यानंतर सानपाडा व जुईनगरच्या मध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी मिळालेल्या भूखंडावर हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावास विरोध करून तो रद्द केला. जागाच मिळत नसल्यामुळे प्रशासनाने तुर्भे डम्पिंग ग्राउंडवर तात्पुरत्या स्वरूपात हे केंद्र सुरू केले आहे. शहरातील कुत्र्यांची संख्या मोठी असून प्रत्येक महिन्याला किमान १५०० ते २००० श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये ४५० शस्त्रक्रिया होत आहेत. जागा उपलब्ध होईपर्यंत शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढविता येणार नाही.
स्थायी समितीमध्ये बुधवारी श्वानदंशावरील लस खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. वर्षाला ४५हजार डोसेसची आवश्यकता लक्षात घेऊन दोन वर्षांच्या लस खरेदीसाठी १ कोटी २२ लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रस्तावावर चर्चा करताना राष्ट्रवादी काँगे्रसचे सूरज पाटील, शिवसेनेचे विठ्ठल मोरे, मनोज हळदणकर, विजयानंद माने व इतर नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली.
भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत. श्वानदंशाच्या घटना वाढत आहेत, परंतु प्रशासन निर्बीजीकरणाचे प्रमाण वाढवत नाही. जागा उपलब्ध केली जात नसल्याबद्दलही सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपक परोपकारी यांनाही धारेवर धरण्यात आले. परंतु स्थायी समितीमध्ये या विषयावर बोलणाऱ्या नगरसेवकांना सर्वसाधारण सभेमध्ये निर्बीजीकरण केंद्रासाठीचे दोन प्रस्ताव फेटाळून लावल्याचा मात्र विसर पडला होता. हे केंद्र लवकर व्हावे अशी परिसरातील रहिवाशांची मागणी आहे. (प्रतिनिधी)