मुंबई : मद्याच्या नशेत ट्रिपल सीट मोटरसायकल चालवल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर, तिसरा जखमी झाला. ही घटना गोराईच्या उत्तन रोडवरील कुमार रेसिडेन्सी लॉजजवळ मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली.
शिवम झा (२७), रियान चौधरी (२७) आणि दिनेश तेवर (२५) हे सायन कोळीवाडा परिसरातील रहिवासी गोराई परिसरात फिरायला आले होते. दरम्यान तिघेही दारूच्या नशेत होते, तर शिवम हा त्याच परिस्थितीत गाडी चालवत होता. भरधाव गाडीवरील शिवमचा ताबा सुटला आणि जवळच असलेल्या पथदिव्यांच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात शिवम आणि रियान यांचा जागीच मृत्यू झाला. तर, तेवर याच्या पायाला दुखापत झाली. शिवम आणि रियान हे कॉल सेंटरमध्ये काम करत होते, तर तेवर हा वाहनांचे इन्शुरन्स विकण्याचे काम करत असल्याची माहिती आहे.