मृत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची वणवण नको! कोर्टाची पश्चिम रेल्वेला तंबी; ८ लाख नुकसानभरपाई देण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 07:10 IST2026-03-12T07:09:34+5:302026-03-12T07:10:34+5:30
ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला कमाल ८ लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेला दिले.

मृत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची वणवण नको! कोर्टाची पश्चिम रेल्वेला तंबी; ८ लाख नुकसानभरपाई देण्याचे निर्देश
मुंबई : विरार स्थानकाजवळ ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला कमाल ८ लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्याचे निर्देश मुंबईउच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेला दिले. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ‘दारोदार भटकण्यास’ भाग पाडू नये, अशी तंबीही न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिली. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई संदर्भातील प्रकरणे न्यायालय किंवा न्यायाधिकरणापर्यंत पोहोचण्याची वेळ येऊ देऊ नये, असे न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने आदेशात म्हटले आहे.
रेल्वेच्या स्वत:च्या अधिकाऱ्यांच्या परस्परविरोधी अहवालांची तपासणी करून रेल्वे प्रशासनाने स्वत:हूनच नुकसानभरपाई मंजूर करायला हवी होती, असेही न्यायालय म्हणाले. बुरूमुरी चालू ट्रेनमधून पडले. अशी घटना रेल्वे कायद्यानुसार ‘अनपेक्षित अपघाती घटना’मध्ये मोडते त्यामुळे न्यायालयाने नुकसानभरपाई देण्याचे व रकमेवर अपघाताच्या तारखेपासून ६ टक्के व्याजही देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.
काय म्हणाले हायकोर्ट?
उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, नुकसानभरपाई मिळण्यासाठी मृत व्यक्ती ‘बोनाफाईड प्रवासी असणे आणि मृत्यू अनपेक्षित अपघाती घटनेतून झालेला असणे आवश्यक आहे.
बुरुमुरी हे रेल्वे कर्मचारी असल्याने त्यांना फ्री पास देण्यात आला होता, यावर कोणताही वाद नव्हता. अपघाताच्या वेळी तो पास त्यांच्या जवळ सापडला नाही म्हणून दावा फेटाळणे योग्य ठरू शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
अधिकाऱ्यांचे सादर केले परस्परविरोधी अहवाल
याप्रकरणात रेल्वे व अधिकाऱ्यांचे परस्परविरोधी अहवाल सादर झाले होते. स्टेशन मास्टरच्या नोंदीनुसार बुरुमुरी यांचा मृतदेह नालासोपारा-विरार दरम्यान आढळला. पंचनाम्यात त्यांचा मृत्यू मेल ट्रेनला धडक लागून झाल्याचे म्हटले होते, तर विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या अहवालात ते रुळ ओलांडताना ट्रेनने धडक दिल्याचे नमूद होते.
या परस्परविरोधी आणि स्वविरोधी अहवालांवर अवलंबून राहून न्यायाधिकरणाने गंभीर चूक केली, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. पुरावे नाकारत न्यायालयाने निष्कर्ष काढला की बुरुमुरी हे चालू ट्रेनमधून पडले. अशी घटना अनपेक्षित अपघाती घटनांमध्ये मोडते.
काय आहे प्रकरण?
मृत कर्मचारी रामन्ना बुरुमुरी हे रेल्वेच्या वाणिज्य विभागात कार्यरत होते आणि त्यांची नियुक्ती एल्फिन्स्टन रोड कार्यालयात होती. १२ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे ते कामावरून परतत असताना व ट्रेन विरार स्थानकाजवळ पोहोचली असता प्रचंड गदीर्मुळे ते खाली पडले. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.