Join us  

मुंबई ठाण्यात जून महिन्यात ३ लाख ३९ हजार ५१५ शिवभोजन थाळ्यांचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 1:30 PM

मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे मध्ये  1 जून ते  30 जून 2020 पर्यंत 56 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 3 लाख 29 हजार 515 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे मध्ये  1 जून ते  30 जून 2020 पर्यंत 56 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 3 लाख 29 हजार 515 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 4 हजार 223 स्वस्त धान्य दुकानांमधून 1 जून  ते 29 जून 2020 पर्यंत 17 लाख 99 हजार 252 शिधापत्रिका धारकांना 7 लाख 2 हजार 910 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी दिली.    

मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 87 लाख आहे.  या लाभार्थ्यांना 4 हजार 223 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. मुंबई ठाणे मध्ये  या योजनेमधून सुमारे 2 लाख 9 हजार 110 क्विंटल गहू, 1 लाख 40 हजार 660 क्विंटल तांदूळ, तर 128 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर सुमारे 1 लाख 17 हजार 428 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. 1 जून ते 29 जून मध्ये 13 लाख 77 हजार 604 रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ वाटप करण्यात आले.  या रेशनकार्डवर सुमारे 64 लाख लोकसंख्येला 3 लाख 4 हजार क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे. राज्य सरकारने 13 लाख 66 हजार 652 एपीएल केशरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो देण्याचा निर्णय घेतला आहे.  1 जून ते 29 जून 2020 पर्यंत 38 हजार 870 क्विंटल या धान्याचे वाटप झाले.

 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची  तरतूद आहे. या योजनेतून सुमारे 19 हजार 740 क्विंटल  डाळीचे वाटप केले आहे. तसेच टंचाई भासू नये याकरिता चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेच्या अन्नधान्य लाभ मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती प्रति महिना 5 किलो मोफत तांदुळ देण्याच्या योजनेद्वारे आतापर्यंत 10 हजार 270 क्विंटल मोफत तांदुळ वितरित केला आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटूंबाला 1 किलो  चन्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे, अशी माहिती  पगारे यांनी दिली.

टॅग्स :शिवसेनाकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या