- खलील गिरकर मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने १ जानेवारीला नवीन नियमावली जारी केली आहे. या नियमावलीच्या तरतुदींमुळे ग्राहकांना लाभ होईल, ग्राहकांना कमी किमतीत अधिक वाहिन्या पाहता येतील, ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य मिळेल, असा दावा ट्रायने केला होता. मात्र ट्रायची नवीन नियमावली केबल चालक व ग्राहकांच्या अडचणीची असल्याचा आरोप केबल चालकांमधून केला जात आहे. याबाबत शिवकेबल सेनेचे सरचिटणीस राजू पाटील यांच्याशी साधलेला संवाद...ट्रायच्या नवीन नियमावलीकडे कसे पाहता?- ट्रायने गतवर्षी लागू केलेल्या नियमावलीच्या जंजाळात ग्राहक व केबल क्षेत्रातील सर्व घटक सापडले होते. यामधील क्लिष्टता व तांत्रिकता समजून घेता घेता एक वर्ष पूर्ण झाले. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत असताना ट्रायने पुन्हा नवीन नियमावली जारी केली आहे. ट्रायचा हा निर्णय अत्यंत चुकीचा, धरसोडीचा व केबल क्षेत्राचे वाटोळे करणारा आहे. या नियमावलीतील तरतुदीप्रमाणे १२ रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या वाहिन्यांचा पॅकेजमध्ये समावेश करता येणार नाही, तर पूर्वी ही मर्यादा १९ रुपये होती. या नियमावलीची अंमलबजावणी झाल्यानंतर ग्राहकांना पुन्हा नव्याने आर्थिक भुर्दंड पडणार आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या वाहिन्या पाहण्यासाठी सध्यापेक्षा किमान १०० ते १५० रुपये अधिक द्यावे लागतील. एकीकडे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड पडणार असताना केबल चालकांसाठी अत्यंत घातक अशी ही नियमावली असून केबल चालकांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती आहे. ग्राहकांच्या हिताचा दावा केला जात असला तरी ब्रॉडकास्टर्स व उद्योगपतींच्या पारड्यात हा केबल उद्योग टाकण्यासाठी ट्राय ही नियमावली लागू करत आहे.
ट्रायच्या नियमावलीचा थेट फटका केबल चालक व ग्राहकांनाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 03:14 IST