धारावीला नवसंजीवनी, बदलणार रूप; आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी होणार नियोजित ‘शहर’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:37 IST2025-06-03T13:37:30+5:302025-06-03T13:37:53+5:30
धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन मंजूर

धारावीला नवसंजीवनी, बदलणार रूप; आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी होणार नियोजित ‘शहर’
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घर’ या महत्त्वाकांक्षी धोरणानुसार मुंबईतीलधारावी पुनर्विकास प्रकल्पाला अखेर सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने या प्रकल्पाचा मास्टर प्लॅन मंजूर करून धारावीवरील ‘एशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी’ या कलंकाला कायमचा विराम दिला आहे. धारावीला नवसंजीवनी देणाऱ्या या प्रकल्पामुळे मुंबईतील सर्वाधिक लोकसंख्येच्या या भागाला नवीन रूप आणि ओळख मिळणार आहे. पुनर्विकास प्रकल्प फक्त पायाभूत सुविधा सुधारण्यापुरता मर्यादित नसून, तो एक हरित, राहण्यायोग्य आणि समावेशक समुदाय तयार करण्याचा दूरदर्शी उपक्रम आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प मुख्यतः अत्यावश्यक पायाभूत सुविधा आणि मोकळ्या जागा यावर भर देत असून, त्यामुळे या भागातील घनदाट वस्तीमुळे निर्माण झालेल्या अडचणींवर मात करता येणार आहे. “धारावी नोटिफाइड एरिया मास्टर प्लॅनमध्ये गुंतागुंतीच्या सध्याच्या रचनेऐवजी एक समावेशक, निसर्गसंपन्न शहरी परिसर घडवण्यावर भर दिला गेला आहे,” असे प्रकल्पाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.
या नव्या नियोजनात महाराष्ट्र नेचर पार्क आणि मिठी नदीच्या किनाऱ्यावरील निसर्गसंपन्न परिसराचा आदर्श घेतला गेला असून, धारावीच्या मध्यभागी नैसर्गिक घटक आणून शाश्वत आणि राहण्यायोग्य परिसर निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी एकाच ठिकाणी धारावी हे मुंबईतील महत्त्वाच्या भागांशी रस्ते, रेल्वे आणि मेट्रो २ मार्गांनी उत्कृष्टरीत्या जोडलेले आहे. उत्तर-दक्षिण तसेच पूर्व-पश्चिम मार्गांनी व्यापारी आणि निवासी भागांशी सहज संपर्क उपलब्ध होण्यामुळे या पुनर्विकासामुळे स्थानिक तसेच व्यापारी जीवनमान सुधारण्यास मोठा हातभार लागणार आहे.
धारावीचे स्थानिक वाहतूक नियोजनाचे ठळक मुद्दे:
- स्थानिक फायदे : धारावी हे पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण वाहतूक मार्गांच्या केंद्रस्थानी असल्याने शहरस्तरीय वाहतूक विनिमयासाठी आदर्श स्थान आहे.
- महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांजवळ : हे मेट्रो लाइन ३, पश्चिम व मध्य रेल्वे यांच्याजवळ असून मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे टर्मिनलपासून केवळ ३ किलोमीटर अंतरावर आहे.
- श्रेणीबद्ध आणि नियोजित रस्त्यांचे जाळे : पादचाऱ्यांसाठी आणि सायकलस्वारांसाठी आणि एनएमटी वापरकर्त्यांसाठी अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी डिझाइन केलेल्या रस्त्यांच्या श्रेणीसह, उत्तम दर्जांच्या रस्त्यांचे जाळे नियोजित आहे.
- रस्ते व मोकळ्या जागांमध्ये संलग्नता : रस्ते मोकळ्या जागांशी संलग्न असतील, ज्यामुळे प्रमुख वाहतूक स्थानकांपर्यंत सुरक्षित, आरामदायी आणि सहज मार्ग उपलब्ध होतील.
- अंतिम रचनेनुसार लवचिकता : सूक्ष्म रस्त्यांचे जाळे हे प्लॉटच्या रचनेचा एक भाग असेल आणि अंतिम आराखड्यानुसार त्यामध्ये बदल होऊ शकतो.
धारावी मास्टर प्लॅन ३ मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित : पुनर्विकासाच्या माध्यमातून आर्थिक परिवर्तन, सशक्त पर्यावरण व पायाभूत रचना, सर्वसमावेशक धारावी
१.२० लाख रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेल्या सेवा (आरोग्य, शिक्षण, वाहतूक आणि बाजारपेठ) अवघ्या १० मिनिटांच्या अंतरात उपलब्ध होणार आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्प - मास्टर प्लॅन
धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) हे धारावीकरांचे जीवनमान व ‘राहणी- उपजीविका’ यामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याची एक अनोखी संधी आहे. दर्जेदार पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवा यांच्या माध्यमातून धारावीकरांसाठी जीवनाचा दर्जा उंचावण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पामध्ये आहे. धारावीच्या वैशिष्ट्यांना जपत, त्याच्या विकासाद्वारे मुंबईला एक नवे, जागतिक दर्जाचे आणि आधुनिक सुविधांनी युक्त असे शहर देणे हा या मास्टर प्लॅनचा उद्देश आहे.
सुलभ सुविधा, उज्ज्वल भवितव्य- धारावी पुनर्विकास प्रकल्प आता केवळ घरेच नव्हे तर जीवनशैली बदलणार आहे. पुनर्विकास आराखड्याचा मुख्य उद्देश म्हणजे धारावीतच एक 'स्मार्ट शहर' उभे करणे हा होय. या अंतर्गत विविध सुविधा एकत्रित करून लोकांना एका सुसज्ज आणि सुलभ जीवनशैलीची दिली जाणार आहे.
महत्त्वाच्या सुविधांचा आराखडा
- ०५ सुलभ सेवा केंद्र उभारण्यात येणार असून त्यातील ३ केंद्रे मराठी शाळांमध्ये कार्यरत राहतील.
- १० मिनिटांत बीकेसीपर्यंत पोहोचवेल धारावी डेपो ते बीकेसी लिंक रोड दरम्यानची स्मार्ट बस.
- १.२ किमीच्या परिसरात नागरिकांना सर्व सेवा सहज मिळणार.
कशा असतील सुविधा...
- मोकळ्या जागा आणि उद्याने : मोठ्या शहर उद्यानांपासून ते छोट्या मोहल्ला मैदानांपर्यंत एकत्रित व सुसंगत सार्वजनिक व हरित जागा उपलब्ध करून देण्यात येतील. या जागा चालण्याजोग्या असतील आणि प्रत्येकासाठी खुल्या असतील. यामुळे पर्यावरणीय संतुलन राखले जाईल. जीवनमान उंचावेल.
- सेंट्रल ‘हार्ट स्पेस’ : धारावीच्या मध्यभागी एक मोठी खुली जागा तयार केली जाईल. ही जागा केवळ धारावीकरांसाठी नव्हे, तर संपूर्ण मुंबईसाठी सण-समारंभ, कार्यक्रम यासाठी खुली असेल.
- चालण्यायोग्य व वाहतूक-केंद्रित विकास : बहुस्तरीय वाहतूक सुविधा उभारण्यात येणार आहेत. नवीन मेट्रो मार्ग, बस फिडर सेवा, सायकल व पादचारी मार्ग, लहान रस्ते एकमेकांशी जोडले जातील अशा प्रकारची रस्त्यांची संरचना असेल. यामुळे नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचणे शक्य होईल.
- बहुपर्यायी वाहतूक केंद्र : धारावीच्या मध्यभागी ट्रान्झिट हब उभारण्यात येईल. येथे आंतरशहर, अंतर्गत शहर, उपनगरी रेल्वे, मेट्रो, हाय-स्पीड रेल्वे, विमानतळ एक्स्प्रेस, बस व अन्य वाहतूक सेवा एकत्रित असतील. येथे २४x७ सेवा उपलब्ध असतील. उपहारगृहे, कॅफे व खरेदीसाठी सुविधा असतील.
- सुलभ सामाजिक सुविधा : शाळा, आरोग्य सेवा व समुदाय केंद्रे अशा सुविधा चालण्याच्या अंतरावर असतील (५-१५ मिनिटे). अत्याधुनिक रुग्णालये, पॉलिक्लिनिक्स, प्राथमिक उपचार केंद्रे व निदान केंद्रे उभारण्यात येतील, ज्यामुळे मध्य मुंबईतील वैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक सशक्त होतील.
- बहुपयोगी वसाहत : रहिवासी, व्यावसायिक व शैक्षणिक उपयोगांचे संतुलन राखून चालण्यायोग्य सुटसुटीत अशा वसाहती उभारल्या जातील.
- उपजीविकाही : उद्योगांसाठी योग्य, स्वच्छ व बांधकामदृष्ट्या मजबूत जागा दिल्या जातील. पात्र उद्योगांना व अपात्र युनिट्सना वाणिज्यिक जागा भाड्याने घेण्याचा पर्याय दिला जाईल. धारावीची ‘लिव्ह-वर्क’ संस्कृती टिकून राहील.
- क्लस्टर विकास : प्रत्येक सामूहिक प्रकल्पामध्ये सार्वजनिक जागा असतील. बालकांसाठी सुरक्षित खेळाच्या जागा व उपकरणे असतील.
- नदीकाठी वॉक वे : मिठी नदीच्या काठाशी एक सुंदर ‘धारावी प्रोमनेड’ तयार केला जाईल, जो शहरातील दुसरा सर्वात मोठा वॉक वे असेल (मरीन ड्राइव्हनंतर). ही जागा सर्व वयोगटांसाठी सामाजिक व विरंगुळ्याचा केंद्रबिंदू बनेल.
- ग्रीन स्पाईन : माहीम निसर्ग उद्यानापासून रेल्वे भागापर्यंत एका हिरवळीत समृद्ध ‘ग्रीन स्पाईन’ तयार केला जाईल. यात सेंट्रल बायोस्वेलचा समावेश असेल, जे पूर व्यवस्थापनासाठी उपयोगी ठरेल.
- धार्मिक स्थळे : सर्व धर्मांच्या अनुयायांसाठी जागतिक दर्जाची धार्मिक संकुले उभारण्यात येणार आहेत.
७२,००० गृहनिर्माण युनिट्स उभारण्यात येणार. हा प्रकल्प धारावीतील लोकांचे जीवन व उपजीविकेचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकणार.
इतरांसाठी ठरणार मार्गदर्शक - धारावीचे पुनर्विकसन हे भारतासाठीच नव्हे तर जगभरातील शहरांसाठी एक आदर्श ठरेल.
- ४९,८३२ - युनिट्स पात्र रहिवाशांच्या धारावीत पुनर्वसनासाठी
- १३,४६८ - युनिट्स व्यापारी व औद्योगिक घटकांच्या पुनर्वसनासाठी
- ८,७०० - युनिट्स महापालिकेच्या निवासी मालमत्तांचे नूतनीकरण
महाराष्ट्र नेचर पार्कच्या पर्यावरणीय समृद्धतेपासून प्रेरणा घेत, धारावीमध्ये हरित नेटवर्कचा विस्तार करण्यात येईल.
- मेट्रो लाइन ११ चा विस्तार थेट धारावीच्या मध्यभागात करण्यात येईल, जेथे एक मल्टी-मोडल ट्रान्झिट हब उभारण्यात येईल. यामुळे शहराच्या परिघावरील वाहतूक संपर्क अधिक सक्षम व सुलभ होतील.
- धारावीच्या मध्यवर्ती भागात एक विस्तीर्ण सेंट्रल पार्क उभारण्यात येईल, जे एक बहुउद्देशीय व सार्वजनिक वापरासाठी खुले असलेले केंद्र असेल.
- धारावी आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरांतील पादचारी व वाहतूक मार्ग अधिक मजबूत करण्यात येतील, ज्यामुळे स्थानिक आणि शेजारील भागांमधील दळणवळण अधिक सुलभ होईल.
- शिक्षण, आरोग्य, किरकोळ बाजारपेठा आणि मोकळ्या जागा यांसारख्या अत्यावश्यक सार्वजनिक सुविधा ५, १० आणि १५ मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर सहज उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून नागरिकांना मूलभूत गरजा सहज पूर्ण करता येतील.
- सक्रिय ‘फाइन-ग्रेन अर्बन फॅब्रिक’ अर्थात सूक्ष्म शहरी रचना तयार करण्यात येईल, जी निवासी, व्यावसायिक आणि सामाजिक सुविधा एकत्रित करणाऱ्या, छोट्या पण सुसंगत व पादचारी अनुकूल ब्लॉक्स तयार करेल. हे एक समावेशक, गतिशील आणि
- सुंदर शहरी जीवनशैली घडविण्यास मदत करेल.
चांगल्या सार्वजनिक सुविधा, उत्तम दर्जाचे रस्ते
धारावी अधिसूचित क्षेत्रातील (डीएनए) ६२० एकरांपैकी सुमारे ५० टक्के जमीन (ज्यामधून काही मालमत्ता वगळण्यात आल्या आहेत.) सार्वजनिक उपयोगासाठी राखून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसाठी अधिक मोकळी जागा, चांगल्या सार्वजनिक सुविधा, उत्तम दर्जाचे रस्ते आणि आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उभारल्या जातील. परिसर अधिक स्वच्छ, आरोग्यदायी बनेल.
एकूण डीएनए क्षेत्र : ६२० एकर त्यापैकी १०९ एकर आधीपासूनच वगळलेल्या मालमत्तांनी व्यापलेले आहेत (जसे की एसआरए इमारती व इतर योजना) उर्वरित क्षेत्राच्या जवळपास ५० टक्के जमीन सार्वजनिक वापरासाठी विकसित केली जाणार.
निव्वळ विकास क्षेत्र : रस्ते, वगळलेल्या मालमत्ता, रेल्वे प्रकल्प क्षेत्र, जलाशय (नाले), आणि टाटा पॉवर रिसिव्हिंग स्टेशन, पंपिंग स्टेशन यांसारख्या सार्वजनिक सेवांसाठी लागणारी जमीन वजा करून उर्वरित क्षेत्र ठरवले जाते.
उर्वरित क्षेत्राचा वापर : हे क्षेत्र निवासी, व्यावसायिक, पुनर्विकास प्रकल्प आणि विक्रीसाठी नियोजित प्रकल्पांमध्ये वापरण्यात येणार आहे, नियमानुसार.
परवडणाऱ्या दरात भाड्याच्या घरांसाठीकिती क्षेत्र? (जमिनीचे वाटप एकरमध्ये)
- १४० - अक्सा आणि मालवणी
- १२४.३ - देवनार
- १२०.५ - आर्थर मिठागर क्षेत्र, भांडुप
- ७६.९ - जेनकिन्स मिठागर क्षेत्र, भांडुप
- ५८.५ - जमास्प मिठागर क्षेत्र, मुलुंड
- २१ - मदर डेअरी जमीन, कुर्ला
धारावी ही केवळ एक वस्ती नाही. ती मजूर, कारागीर, सूक्ष्म उद्योग आणि वंचित समुदायांनी साकारलेली एक प्रभावशाली सूक्ष्म-अर्थव्यवस्था आहे.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून येथील रहिवाशांना केवळ नवीन घरेच नव्हे, तर एक नव्या जीवनशैलीत जगण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
माझ्या मुलांचं भवितव्य आता उजळणार आहे. आधी त्यांना शिक्षणासाठी खूप अडचणी यायच्या, आता शाळा जवळ असतील म्हणून शिक्षणात खंड येणार नाही.
- मालती नाडर, (३८)
दक्षिण भारतात जशा सुसज्ज वस्ती योजना आहेत, तसाच काहीसा अनुभव आता धारावीत मिळणार आहे. ही सकारात्मक झेप वाटते. यामुळे भरपूर सुविधा मिळतील.
-प्रभू , (२६)
धारावी पुनर्विकास म्हणजे आमच्यासाठी मोठी संधी आहे. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिल्यानंतर आता आम्हाला एक नवसंजीवनी मिळतेय असं वाटतं.
- स्टेला नाडर , (५७)