Join us  

ऊर्जामंत्र्यांच्या नावानं मुंडण, परीक्षेत निवड होऊनही 2 वर्षांपासून नियुक्तीच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 2:39 PM

मुंबईतील आझाद मैदानात 35 दिवस आंदोलन केलं, त्यावेळी परिपत्रक घेऊन गेलं की ते सर्वोच्च न्यायालयाचं कारण सांगायचे. आता, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं आहे

ठळक मुद्देपरीक्षा दिली, निकाल लागला, निकालाच्या यादीतून निवडही झाली. त्यामुळे, घरात आनंदाचं वातावरण होतं. सचिनला सचिन तेंडुलकरने सेंच्युरी मारल्याचा आनंद झाला

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिलेल्या एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच, राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर सरळसेवा भरतीद्वारे परीक्षा देऊन, मुलाखत देऊन निवड झालेल्या उमेदवारांची अद्याप नियुक्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना संताप व्यक्त केला आहे. इंजिनिअर सचिन चव्हाण यांनी आपले मुंडण करुन राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे. 

राज्य सरकारने महावितरणमधील उपकेद्र सहायक पदासाठी परीक्षा घेतली होती. ऑगस्ट 2019 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा 28 जून 2020 रोजी निकालही लागला. मात्र, अद्याप नियुक्ती न मिळाल्याने सचिन चव्हाण यांनी घरीच मुंडन करुन ऊर्जामंत्र्यांच्या नावाने निषेध व्यक्त केला आहे. महावितरणने घेतलेल्या परीक्षांमध्ये 289 विद्यार्थ्यांची निवड झाली असून 70 ते 80 मुले वेटींगवर असल्याचं सचिन यांनी सांगितलं.

 

अहमदनगर जिल्ह्याच्या नगर तालुक्यातील सचिन चव्हाण यांनी इलेक्ट्रीकल्स विषयात आयटीआय पूर्ण केला. त्यानंतर इंजिनिअरिंगची पदवीही घेतली. मात्र, सरकारी नोकरी असल्याने महावितरणमधील जाहिरात पाहून आयटीआय पात्रतेवरुन असलेल्या उपकेंद्र सहायक पदासाठी अर्ज भरला. परीक्षा दिली, निकाल लागला, निकालाच्या यादीतून निवडही झाली. त्यामुळे, घरात आनंदाचं वातावरण होतं. सचिनला सचिन तेंडुलकरने सेंच्युरी मारल्याचा आनंद झाला. मात्र, पावसामुळे सामना थांबावा तसा, मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकियेमुळे या सचिनची नियुक्ती थांबली. त्यामुळे, थांबा आणि वाट पहा... अशीच अवस्था सचिनची झालीय.  

निवड यादीत नंबर लागल्याने सचिनला पडताळणीसाठी बोलविण्यात आले होते. पण, कोरोनाचे कारण देऊन ती पडताळणी प्रक्रिया दोनदा रद्द करण्यात आली. त्यानंतर, 15 सप्टेंबर रोजी पुन्हा व्हेरिफिकेशन करुन घेणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, 9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थिगिती मिळाल्याने पुन्हा आमच्या नियुक्तीचं घोंगडं भिजत पडलं, असे सचिनने लोकमतशी बोलताना सांगितले.  

मुंबईतील आझाद मैदानात 35 दिवस आंदोलन केलं, त्यावेळी परिपत्रक घेऊन गेलं की ते सर्वोच्च न्यायालयाचं कारण सांगायचे. आता, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं आहे. मात्र, राज्य सरकार पर्यायी मार्ग काढून ज्यांची निवड झाली आहे, त्यांना नियुक्ती देऊ शकते. पण, मंत्रीमहदय केवळ बैठकाच घेत आहेत. आता 2 वर्षे होत येतील परीक्षा पास होऊन, पण राज्य सरकारला आमचं काहीच पडलं नाही, आम्ही पूर्णपणे हतबल झालो आहोत, अशा शब्दात सचिन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, देव करो आणि ऊर्जामंत्र्यांना, राज्य सरकारला आमची आठवण होवो, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :नितीन राऊतकोरोना वायरस बातम्यापरीक्षामराठा आरक्षण