Deputy CM Eknath Shinde News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले. औरंगजेब क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस तेवढेच क्रूर आहेत, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानावरून महायुतीतील नेते काँग्रेसवर सडकून टीका करत आहेत. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार टीका केली.
विधान भवनात पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अबू आझमींनी याची सुरुवात केली. अबू आझमीला काही विशिष्ट समाजाच्या मतांची जुळवणी करायची असते. परंतु, विशिष्ट मते घेत असताना समाजांमध्ये द्वेष निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच अबू आझमीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. औरंगजेबाचे समर्थन, उदात्तीकरण करण्यासाठी पुढे येतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. औरंगजेबाने राज्यात अनेक अत्याचार केले. औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
औरंगजेबाने अनन्वित अत्याचार केले होते
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेबाची तुलना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली. म्हणाले की, हे क्रूर प्रशासक आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचे डोळे काढले का, त्यांची जीभ छाटली का, त्यांची नख काढली का, त्यांची सालपट सोलली का, काय केले? औरंगजेबाने अनन्वित अत्याचार केले होते. तुम्ही त्यांची बरोबरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची करता. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य चालवत आहोत. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम करत आहोत, या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना आम्ही अनेक योजना सुरू केल्या, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या, या राज्याला विकासाकडे नेले. अडीच वर्ष आम्ही काम केले, त्याची पोचपावती म्हणून जननेते आम्हाला लँडस्लाईड मँडेट दिले. आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि आम्ही टीम म्हणून काम करत आहोत. या राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी करण्याचा आमचा अजेंडा आहे. कुठे औरंगजेब आणि कुठे देवेंद्र फडणवीस? अशी तुलना करण्यापूर्वी त्यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे होती, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर थेट निशाणा साधला.