मुंबई - महाराष्ट्र शासनातर्फ़े 'संविधान हत्या दिवस' निमित्त आज राजभवन, मलबार हिल, मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आणीबाणी काळामध्ये संविधान रक्षणासाठी जनतेने दिलेल्या लढ्याला स्मरून संविधान हत्या दिन पाळण्यात आला.लोकशाही चिरायू होवो ही त्यामागील भुमिका होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री अशोक उईके यांची प्रमुख उपस्थित होती.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना "The Conscience Network – A Chronicle of Resistance to a Dictatorship" हे सुगाता श्रीनिवासराजू लिखित पुस्तक भेट दिली. या भेटीत डॉ. गोऱ्हे यांनी आणीबाणी काळातील अनुभव, त्या काळात उभ्या राहिलेल्या जनआंदोलनांचे संदर्भ व लोकशाही टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांविषयी मोलाचा संवाद साधला.
राज्यपाल यांनी डॉ. गोऱ्हे यांना आणीबाणी काळातील त्यांच्या आठवणी सांगितल्या. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतदेखील चर्चा करत त्या काळातील आंदोलनांच्या आठवणींना उजाळा दिला.