मुंबईकरही या राणीच्या प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 11:56 IST2025-06-08T11:56:20+5:302025-06-08T11:56:45+5:30

Deccan Queen Express: डेक्कन क्वीन एक्स्प्रेस म्हणजे दख्खनची खरंच राणी आहे. पुण्याला दख्खनची राणी म्हटलं जातं. तिथून ती मुंबईला येते, म्हणून ती दख्खनची राणी. पुणेकरांना तिचा खूप अभिमान. ती आमची गाडी आहे, असं ते म्हणतात आणि मानतातही, पण ती येते महाराष्ट्राच्या राजधानीत, देशाच्या आर्थिक राजधानीत.

Deccan Queen Express: Mumbaikars are also in love with this queen! | मुंबईकरही या राणीच्या प्रेमात!

मुंबईकरही या राणीच्या प्रेमात!

-संजीव साबडे
डेक्कन क्वीन एक्स्प्रेस म्हणजे दख्खनची खरंच राणी आहे. पुण्याला दख्खनची राणी म्हटलं जातं. तिथून ती मुंबईला येते, म्हणून ती दख्खनची राणी. पुणेकरांना तिचा खूप अभिमान. ती आमची गाडी आहे, असं ते म्हणतात आणि मानतातही, पण ती येते महाराष्ट्राच्या राजधानीत, देशाच्या आर्थिक राजधानीत. म्हणजे आर्थिक राजधानी व सांस्कृतिक राजधानी यांचा मिलाफ डेक्कन क्वीनने घडवून आणला आहे. ती ९६ वर्षांची झाली, तरी आजही तरुण आहे. मुंबई-पुण्यातल्या लोकांचं राजधानी वा अन्य कोणत्याही ट्रेनपेक्षा अधिक प्रेम आहे या गाडीवर. पुण्याला जायचं म्हटलं की डेक्कनने जाऊ, डेक्कनची तिकिटं मिळतात का, ते पाहू, अशी चर्चा सुरू होते. इतकी या गाडीची सवय झाली आहे. ही गाडी जणू मुंबई-पुणे यांच्या नात्याची ‘ब्रॅण्ड ॲम्बेसिडर‘च होऊन बसली.

डेक्कन क्वीनचे ते मस्त डबे, तो रंग, त्यातील डायनिंग कार, काही वर्षांपूर्वी त्यात आलेले विस्ताडोम कोच, पासधारकांचे डबे या प्रत्येक बाबीने ती पुणेकरांप्रमाणेच मुंबईकरांचीहीही अत्यंत लाडकी झाली आहे. नंतर तशाच नावाची डेक्कन एक्स्प्रेस सु्रू करण्यात आली. पण, डेक्कन क्विनचा तोरा आणि महत्त्व कायम आहे. या गाडीचा रंग आतापर्यंत तीनदा बदलला. सुरुवातीला सात डबे पुरेसे वाटायचे. पण मुंबईत येऊ इच्छिणाऱ्यांची गर्दी इतकी वाढली की आता ही गाडी तब्बल १६ डब्यांची झाली आहे. तरी अनेकदा तीच तिकीट मिळत नाही. आयत्या वेळी तर अजिबातच नाही.

ब्रिटिशांनी ती १ जून १९३० साली स्वतःसाठी सु्रू केली होती. दोन्ही शहरात होणाऱ्या घोड्यांच्या शर्यतींना जाण्यासाठी केलेली ती सोय होती. आशिया खंडातील पहिली विजेवर चालणारी इंटरसिटी ट्रेनमध्ये भरमसाठ थांबे नाहीत आणि सव्वातीन तासांत तुम्ही दुसऱ्या शहरात पोहोचणार. त्यामुळे ती लोकप्रिय होणं स्वाभाविक. पुढे १९४३ साली ती सर्वांसाठी खुली झाली. आता रोज सकारी हजारो व खासगी उद्योगातील सरकारी कर्मचारी आणि इतरांना ती पोटापाण्यासाठी इथं आणून सोडते. म्हणजे, ही राणी पुणेकरांच्या अर्थार्जनाची सोय करते आणि मुंबईकरांना सांस्कृतिक व शिक्षणाच्या हबमध्ये घेऊन जाते.

यातील निम्मे वा त्याहून अधिक प्रवासी रोजचे आणि ठरलेले. भले ते पासधारक असोत वा नसोत. त्यांच्या बसण्याच्या जागा व खाण्याच्या सवयी ठरलेल्या. रोज एकत्र येण्या-जाण्यामुळे त्यांचं आपापसात दोस्ती पलीकडचं नातं बनलं आहे. एखादा दोन दिवस आला नाही तर लगेच फोनफोनी, तब्येतीची चौकशी आणि मदतीचा हात दिलं जातं. ही आत्मीयता केवळ या राणीमुळे. या गाडीमुळे हजारो सरकारी व खासगी कर्मचारी दिवसाचे १२ तास मुंबईकर होतात. त्या पुणेकरांचं या ट्रेनमुळे मुंबईवरही प्रेम जडलं आहे. मुंबईत येताना राणी एकेकट्याची असते, पण असंख्य मुंबईकर या कुटुंबासह प्रवास करत असल्यानं बऱ्यापैकी कुटुंबाची राणी होते. त्यामुळे वसंत बापट ‘दख्खन राणीच्या बसून कुशीत, शेकडो पिल्लेही चालली खुशीत’ असं लिहून जातात. ट्रेनमधून जातायेता दिसणारा हिरवागार खंडाळ्याचा घाट पाहून गीतकार रमेश अणावकर यांना ‘हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांगो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट’ हे गाणं लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. खरोखर ही राणी प्रेम करावी, अशीच आहे.

Web Title: Deccan Queen Express: Mumbaikars are also in love with this queen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.