आर्थिक स्थितीवरून कुरघोडीचे राजकारण

By Admin | Updated: August 26, 2015 23:08 IST2015-08-26T23:08:48+5:302015-08-26T23:08:48+5:30

महापालिकेच्या आर्थिक स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी व विरोधकांमधील कुरघोडीचे दर्शन शहरवासीयांना पहावयास मिळाले.

Crushing politics due to financial condition | आर्थिक स्थितीवरून कुरघोडीचे राजकारण

आर्थिक स्थितीवरून कुरघोडीचे राजकारण

-  नामदेव मोरे, नवी मुंबई
महापालिकेच्या आर्थिक स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी व विरोधकांमधील कुरघोडीचे दर्शन शहरवासीयांना पहावयास मिळाले. दोन्ही दिवस सर्वपक्षीयांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. १११ पैकी फक्त ३० नगरसेवकांनीच चर्चेत सहभाग घेतला. सभेच्या शेवटी आयुक्त व महापौरांचे स्पष्टीकरण ऐकण्यासाठी फक्त ४५ नगरसेवक उपस्थित होते. उर्वरित ६६ जणांनी अर्ध्यातून पळ काढल्यामुळे सभा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शासनाने एलबीटी बंद केल्यामुळे नवी मुंबई महापालिकेस मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पालिकेच्या आर्थिक स्थितीची माहिती सर्व नगरसेवकांना व्हावी, उत्पन्नाचे नवीन मार्ग सुचविता यावेत यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये प्रशासनाने २० वर्षांमधील उत्पन्न व खर्चाचा ताळेबंद सादर केला. विकासकामांचा स्पील ओव्हर, कर्ज, थकबाकी सर्व माहिती देण्यात आली. या विषयावर सर्वपक्षीय नगरसेवक अभ्यासपूर्ण मते मांडतील अशी अपेक्षा होती. परंतु सत्ताधारी व विरोधक दोघांंनीही या सभेचा वापर एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यासाठी केला. सभेच्या सुरवातीस शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी प्रशासनास आर्थिक स्थितीचे सादरीकरण करण्यास विरोध केला. जवळपास दोन तास गोंधळ घालून सभेचा वेळ फुकट घालवला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी चौकशी समिती नेमण्याची मागणी केली तर मनोज हळदणकर यांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. इतर नगरसेवकांनीही भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवरही अप्रत्यक्षपणे तोंडसुख घेतले. यामुळे दोन्ही दिवस सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक होवू लागली होती. चर्चेेपेक्षा गोंधळामध्येच जास्त वेळ वाया गेला.
आर्थिक परिस्थितीवर चर्चा सुरू असताना अनेकांना विषयाचे गांभीर्य लक्षात आले नव्हते. भाषण करणाऱ्या नगरसेवकांकडून मध्येच वायफळ बडबड केली जात होती. यामध्ये विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांचाही समावेश होता. नगरसेवकांच्या या वर्तनाविषयी महापौर सुधाकर सोनावणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना कारवाई करण्याचा इशारा द्यावा लागला. सर्वांना चर्चा करता यावी यासाठी दुसऱ्या दिवशी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कामकाज सुरू होते. परंतु १११ नगरसेवकांपैकी फक्त ३० नगरसेवकांनीच चर्चेत सहभाग घेतला होता. उर्वरित ८१ नगरसेवकांनी चर्चेत सहभागच घेतला नाही. विशेष महासभेत आयुक्तांची भूमिका महत्त्वाची होती. आर्थिक स्थिती व भविष्यातील परिस्थिती यावर ते वस्तुस्थितीदर्शक माहिती देणार होते. परंतु त्यांचे भाषण सुरू झाले तेव्हा फक्त ४५ नगरसेवकच उपस्थित होते. सत्ताधारी गटातील ६७ पैकी ३० व विरोधातील ४४ नगरसेवकांपैकी फक्त १५ जण उपस्थित होते. नगरसेवकांच्या या उदासीनतेविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महासभेचा विक्रम
पहिल्याच विशेष महासभेने रात्री उशिरापर्यंत सभा चालविण्याचा विक्रम केला. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कामकाज सुरू होते. सभेला उशीर झाल्यामुळे अनेक नगरसेवकांनी अर्ध्यातून पळ काढला. परंतु अनेक नागरिक सभा संपेपर्यंत प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून होते. पहिल्यांदाच एवढ्या उशिरापर्यंत सभेचे कामकाज चालविण्यात आले. परंतु दोन दिवसांच्या सभेमध्ये सत्ताधारी व विरोधकांनी गोंधळ घातला नसता तर एवढ्या उशिरापर्यंत थांबण्याची वेळ आली नसती असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

१११ पैकी ३० नगरसेवक चर्चेत सहभागी
१११ नगरसेवकांपैकी फक्त ३० नगरसेवकांनीच चर्चेत सहभाग घेतला. यामध्ये उपमहापौर अविनाश लाड, जयवंत सुतार, विजय चौगुले, नेत्रा शिर्के, अपर्णा गवते, गिरीष म्हात्रे, शंकर मोरे, रवींद्र इथापे, अंजली वाळुंज, अशोक गुरखे, मंदाकिनी म्हात्रे, रामदास पवळे, किशोर पाटकर, संजू वाडे, द्वारकानाथ भोईर, निवृत्ती जगताप, मोनिका पाटील, शिवराम पाटील, नामदेव भगत, एम. के. मढवी, रामचंद्र घरत, अनंत सुतार, दिव्या गायकवाड, उज्ज्वला झंजाड, उषा भोईर, गणेश म्हात्रे, मनोज हळदणकर, सोमनाथ वास्कर, घनश्याम मढवी, सूरज पाटील यांचा समावेश आहे. इतरांनी महत्त्वाच्या विषयावर गप्प बसणे पसंत केले.

आयुक्तांनी दिली सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे
महापालिकेच्या आर्थिक स्थितीविषयी सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ३० नगरसेवकांपैकी अनेकांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनावर टीका केली. भ्रष्टाचाराचे आरोपही केले.
काही नगरसेवकांनी उत्पन्नवाढीसाठी चांगल्या उपाययोजना सुचविल्या. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तब्बल दीड तास भाषण करून प्रत्येक नगरसेवकाच्या शंकांचे निरसन केले. चांगल्या सूचनांचे स्वागत केले.
टीकाकारांनाही वास्तव माहिती देवून आरोप कसे तथ्यहीन आहेत हे दाखवून दिले. लपवाछपवी न करता वास्तव माहिती सभागृहाच्या पुढे ठेवली. २००९ व १० नंतरचे ताळेबंद शिल्लक असून २०१२ - १३ नंतरचे लेखा परीक्षण शिल्लक असल्याचे सांगून ते वेळेवर पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. उत्पन्नवाढीसाठी महापालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली.
थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांची बँक खाती सिल केली असल्याचे सांगितले. मालमत्ता कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी व ठाण्याच्या धर्तीवर पाण्यासाठी अभय योजना सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विकासकामे करताना स्पील ओव्हर येतच असतो ती चिंतेची गोष्ट नसून एलबीटी रद्द झाला असला तरी शासनाकडून जास्तीत जास्त अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही स्पष्ट केले.

Web Title: Crushing politics due to financial condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.