Corona Virus : "घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 10:05 IST2025-05-26T10:03:03+5:302025-05-26T10:05:02+5:30
Corona Virus : मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत दररोज सरासरी ९ जणांना कोरोनाची लागण होत आहे.

Corona Virus : "घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण
मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत दररोज सरासरी ९ जणांना कोरोनाची लागण होत आहे. मुंबईसह देशभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत इंडियन मेडिकल काऊन्सिल (IMA) ने कोरोनाला घाबरू नका, पण सतर्क राहा असं म्हटलं आहे.
"कोरोना व्हायरस पुन्हा परत येत आहे, परंतु त्याचा प्रभाव २०२० किंवा २०२१ सारखा नाही. कोरोना आता येत राहील, म्हणजेच दर काही महिन्यांनी त्याचं नवीन रुप दिसू शकतं" असं आयएमए कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव विजयदेवन यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.
मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण
डॉ. राजीव यांनी स्पष्ट केलं की, जेव्हा व्हायरस येतो तेव्हा शरीर प्रतिक्रिया देतं, परंतु काही काळानंतर ती प्रतिक्रिया देखील सामान्य होते. जर या काळात व्हायरस बदलला तर जुनी रोग प्रतिकारशक्ती तितकी प्रभावी राहणार नाही आणि लोकांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो. रविवारी राज्यात ४३ नवीन कोरोना रुग्ण आढळले, त्यापैकी ३५ मुंबईत, ७ पुणे शहरात आणि १ पुणे ग्रामीणमध्ये आढळले. जानेवारीपासून राज्यात एकूण ३०० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी २४८ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत मे महिन्यात २४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.
टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
३-४ दिवसांत बरे होतात रुग्ण
कोरोना व्हायरसची लक्षणं खूपच सौम्य आहेत. ताप, सर्दी, थकवा लोकांना जाणवत आहे. बहुतेक लोक कोणत्याही विशेष उपचारांशिवाय ३-४ दिवसांत बरे होतात. त्यामुळे अँटीबायोटिक्स अजिबात वापरू नका, ते व्हायरसविरुद्ध प्रभावी नाहीत असं डॉ. राजीव यांनी म्हटलं आहे.
मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे, त्याबद्दल डॉ. राजीव म्हणाले की, सर्व रुग्ण आधीच कॅन्सर, किडनीचा आजार किंवा मधुमेह यासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होते. अशा रुग्णांमध्ये, कोणताही किरकोळ आजार गंभीर ठरू शकतो, परंतु याचा अर्थ असा नाही की कोरोना अजूनही प्राणघातक आहे.
चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
या गोष्टी ठेवा लक्षात
- घाबरू नका, जर सौम्य लक्षणं दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- स्वतःहून अँटीबायोटिक्स घेऊ नका.
- फ्लूची लस घेणं फायदेशीर आहे, परंतु ती कोरोनापासून संरक्षण करत नाही.
- वृद्ध आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.