Join us

Coronavirus: वांद्रा रेल्वे स्टेशन गर्दी प्रकरणातील आरोपी विनय दुबेला जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 16:25 IST

वांद्रा येथील न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर विनय दुबे यास जामीन मंजूर  केला आहे. विनय दुबे हा घर चलो कॅम्पन चालवत होता, त्यामुळे याप्रकरणी चौकशीनंतर पोलिसांनी

मुंबई - राजधानी मुंबईतील वांद्रा स्टेशनजवळ, वांद्रे येथील परप्रांतीय मजुरांचा आक्रोश पाहायला मिळाला. जवळपास १५०० मजूर रागाच्या भरात वांद्रे पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर जमा झाले होते. १४ मे रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जवळपास १५०० परप्रांतीय मजूर आपल्या मूळगावी जाण्यासाठी एकत्र जमले होते. त्यांना घरी जाण्याची आतुरता होती. मात्र, लॉकडाऊन वाढल्यानं असंतोष त्यांच्यात उत्पन्न झाला आणि हा उद्रेक झाला, असे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर  भारतीय महापंचायतचा प्रमुख विनय दुबे आणि पत्रकार राहुल कुलकर्णी यांस अटक केली होती. पत्रकार राहुल कुलकर्णी यांना यापूर्वीज जामीन मंजूर झाला आहे. आता, विनय दुबे यासही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

वांद्रा येथील न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर विनय दुबे यास जामीन मंजूर  केला आहे. विनय दुबे हा घर चलो कॅम्पन चालवत होता, त्यामुळे याप्रकरणी चौकशीनंतर पोलिसांनी दुबेविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली. तसेच, एका वृत्तवाहिनीच्या बातमीमुळे हे मजूर गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे जमले होते, अशी चर्चा सोशल मीडियावर पसरली होती. सर्वत्र गोंधळसदृश्य परिस्थीती निर्माण झाली होती. त्यामुळे ती बातमी देणाऱ्या पत्रकारासही अटक करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी पत्रकाराचा जामीन मंजूर झाला होता. 

उत्तर भारतीय महापंचायतचा प्रमुख विनय दुबे याने मजुरांना व्हिडीओमार्फत भडकविल्याचा आरोप करत त्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याने हा व्हिडीओ त्याच्या सफारी गाडीमध्ये बसून बनविला. त्यानुसार त्याची ती गाडी हस्तगत करण्यात आल्याचे त्याच्या घरच्यांना पोलिसांकडून सांगण्यात आले. या गाडीचा पंचनामा करण्यात येणार असून, गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास ही गाडी रबाळे परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतली होती. गुन्ह्यात त्याने वापरलेली प्रत्येक वस्तू पोलीस ताब्यात घेत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावरून दुबे याच्या कुटुंबीयांना येणाऱ्या धमक्यांचे प्रमाण वाढले असल्याने त्यांना सुरक्षा पुरविणे गरजेचे असल्याचे त्याचे वकील अ‍ॅड. तन्वीर फारुखी यांचे म्हणणे आहे. याप्रकरणातील १२ संशयितांपैकी पत्रकार राहुल कुलकर्णीला जामीन देण्यात आला होता. मात्र, आता न्यायालयाने जामीन दिल्यामुळे विनय दुबेला दिलासा मिळाला आहे. 

दरम्यान, कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने यापूर्वी देशभरात २१ दिवस लॉकडाऊन केलं होतं. मात्र लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु झाला असून ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. पहिल्या लॉकडाऊन दरम्यान ट्रेनच्या तिकिटांचे बुकिंग सुरू होते. १४ एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा रेल्वेचा प्रवास सुरू करता येईल, अशी लोकांना आशा होती. लॉकडाऊन दरम्यान ३९ लाख रेल्वे तिकीट बुकींग करण्यात आले होते. पण लॉकडाऊन वाढविल्यानंतर रेल्वेने मंगळवारी 3 मे पर्यंत सर्व प्रकारच्या प्रवासी सेवाच रद्द केल्या नाहीत तसेच या काळात केलेले बुकिंगही रद्द केले.  

टॅग्स :मुंबईवांद्रे पश्चिमकोरोना वायरस बातम्यागुन्हेगारी