Join us  

लॉकडाऊनदरम्यान गृहनिर्माण सोसायट्यांसाठी उपनगर अपर जिल्हाधिकाऱ्यांची नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 3:07 PM

कोविड -१९ च्या निर्मूलनासाठी शासनाने दि,१४ पासून लॉकडाऊन घोषीत करून १४४ कलम लागू करून संचारबंदी लागू केली आहे.

मुंबई - देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने महाराष्ट्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथ प्रतिबंधक कायदा १८९७ च्या तरतूदी अंतर्गत कायवाही सुरू केली आहे. कोविड -१९ च्या निर्मूलनासाठी शासनाने दि,१४ पासून लॉकडाऊन घोषीत करून १४४ कलम लागू करून संचारबंदी लागू केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनतेने  घराबाहेर  न पडणे,गर्दी निर्माण करणाऱ्या घटना टाळण्याबाबत दक्षता घेणे आवश्यक असतांना,प्रत्यक्षात मात्र भाजीपाला, किराणा खरेदीसाठी दुकानात गर्दी होत आहे.त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक गृहनिर्माण सोसायट्यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत कोणती जबाबदारी पार पडायची असे आदेश मुंबई उपनगर अपर जिल्हाधिकारी( कोरोना कक्ष) यांनी आपल्या परिपत्रकाद्वारे  दिले आहेत.

गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर त्यांच्या सभासदांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी टाळण्याची जबाबदारी मुंबई उपनगर अपर जिल्हाधिकारी( कोरोना कक्ष) यांनी सोपवली आहे.

या आदेशानुसार - संस्थेच्या गेटवर सॅनिटायझर्स ठेवून प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हात त्यांना स्वच्छ करण्यास सांगणे,- इंटरकॉमद्वारे प्रत्येक सदस्यास आवश्यक असणारा किराणा,भाजीपाला इत्यादी गोष्टींची मागणी गोळा करून त्यानुसार सदर ऑर्डर द्यावी तसेच किराणा,भाजीपाला गेटवर आल्यावर गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक सभासदाच्या घरी सिक्युरिटी मार्फत किंवा सदस्याला एकएकटे बोलावून सदर मालाचे वितरण करावे,- संस्थेचे सदस्य करणाशिवाय गेटच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी - संस्थेचा बगीचा,क्लब हाऊस येथे लहान मुले एकत्र येणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाय योजावेत असे आदेश या परिपत्रकाद्वारे  गृहनिर्माण सोसायट्यांना देण्यात आले आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई