coronavirus: धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा , परवानगीची गरज नाही, महापालिकेने केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 03:13 IST2020-05-14T03:12:39+5:302020-05-14T03:13:26+5:30
ही कामे करताना सुरक्षेच्या निकषांचे काटेकोर पालन करावे लागेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना पावसाळ्यापूर्वीची कामे करण्याची मंजूरी यापूर्वी देण्यात आली होती.

coronavirus: धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा , परवानगीची गरज नाही, महापालिकेने केले स्पष्ट
मुंबई : कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे बांधकामांवर बंदी घालण्यात आली असल्याने धोकादायक अवस्थेतील इमारतींची दुरुस्तीही करता येणार नाही असा सर्वसाधारण समज होता. मात्र, मुंबई पालिकेने १२ मे रोजी एक परिपत्रक काढून इमारत दुरुस्तीच्या कामांसाठी महापालिकेकडून कोणत्याही परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ही कामे करताना सुरक्षेच्या निकषांचे काटेकोर पालन करावे लागेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना पावसाळ्यापूर्वीची कामे करण्याची मंजूरी यापूर्वी देण्यात आली होती. परंतु, त्यातील काही अटी आणि राज्य सरकारने २ मे रोजी काढलेल्या एका परिपत्रकातील अटींमुळे संभ्रम निर्माण झाला होता. तसेच, काही विकासकांनी हे आदेश संदिग्ध असल्याचेही सांगितले होते. त्यामुळे पालिकेने हे स्पष्टीकरण दिले आहे.
ज्या बांधकामाच्या साइटवर मजूर उपलब्ध आहेत तिथे मार्गदर्शक तत्त्वानुसार पावसाळ्यापूर्वीची आवश्यक कामे करण्याची परवानगी आहे.
तिथल्या साइटवरील अन्य कर्मचाऱ्यांसाठी प्रवास पास आवश्यक असेल. त्याशिवाय एमएमसी अॅक्टच्या कलम ३४२ अन्वये केली जाणारी इमारतींची दुरुस्ती, वॉटर प्रूफिंग, टेरेसची, सी- १ श्रेणीत जाहीर झालेल्या धोकादायक इमारतींचे पाडकाम करण्यासाठी नव्याने परवानगीची गरज नाही.
तसेच इमारत सी-१ या श्रेणीत अतिधोकादायक म्हणून जाहीर झाली असेल तर तिथल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करून सभोवतालच्या इमारतींना त्यामुळे धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मंजुरी मिळाली, पण कोंडी कायम पालिकेने दुरुस्तीच्या कामांसाठी परवानगी दिली असली तरी काम करणे अवघड असल्याचे सांगितले जात आहे. या कामांसाठी कंत्राटदार नियुक्ती अवघड झाली आहे. दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले साहित्य आणि मजूर मिळणे अवघड असल्याने ही कामे करायची कशी, असा सवाल कंत्राटदारांकडून उपस्थित केला जात आहे.