Join us  

CoronaVirus News: दिलासादायक! राज्यात एकाच दिवशी ८,३८१ रुग्ण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 2:27 AM

एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून आतापर्यंत राज्यभरात २६ हजार ९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

मुंबई : कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी उच्चांक गाठला. एकाच दिवशी तब्बल ८३८१ कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यात मुंबईतील सर्वाधिक ७३५८ रुग्णांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून आतापर्यंत राज्यभरात २६ हजार ९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

देशासह राज्यात कोरोनाचा संसर्गाचा वाढता वेग पाहून सर्वांनाच धडकी भरली असतानाच ही आकडेवारी दिलासा देणारी आहे. बरे झालेल्या रुग्णांत मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक १६ हजार ८ बरे झाले आहेत. याशिवाय ठाण्यात २७२९, पुण्यात ३४२५, सोलापूर ३१४, रायगड ५१८, नाशिक ८१८, औरंगाबाद ९५९, नागपूर ३४२ अशी संख्या आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांसाठी त्रिस्तरीय उपचार पद्धती असून २५७६ उपचार केंद्र कार्यान्वित आहेत. २७५ डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल आहेत. त्यात एकूण खाटा ३३,५३८ असून अतिदक्षता विभागातील ५००३ खाटा आहेत. २०२८ व्हेंटीलेटर असून २,५६,४८५ पीपीई कीट आहेत. तर ४,३१,२१४ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत. याशिवाय, ४४९ डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल सेंटर कार्यरत आहेत. त्यात एकूण खाटा २८,९२७ असून अतिदक्षता विभागातील २१३७ खाटा आहेत. ६१५ व्हेंटीलेटर असून ६४,३०८ पीपीई कीट आहेत तर २,११,८४७ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.

तसेच, १६४३ कोविड केअर सेंटर आहेत. त्यात एकूण खाटा २,०६,४२८ असून १,५४,८६० पीपीई कीटसाठी आहेत. तर ३,२५,९६१ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत. तर वर्गवारी न केलेले २०५ उपचार केंद्रांसह २५७२ उपचार केंद्रांत एकूण २,७८,४५९ आयसोलेशन बेड आहेत. त्यातील अतिदक्षता विभागातील एकूण खाटा ८५०१ आहेत. गरजेनुसार खाटांची क्षमता वाढविण्यात येत आहे. ही पायाभूत सुविधा आणि कोविड योद्धे म्हणून दिवसरात्र राबणारे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी, यांच्यामुळे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढल्याचे दिसून येते.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी

मान्सून उंबरठ्यावर उभा आहे, हे लक्षात घेता येणाऱ्या काळात कोरोना शिवाय इतर साथरोग देखील वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने पूर्वतयारी सुरु आहे. हिवतापासाठी संवेदनशील जिल्ह्यांत कीटकनाशक फवारणीचे नियोजन केले आहे तर पाणी गुणवत्तेसाठी स्वच्छता सर्वेक्षण सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र