Join us  

CoronaVirus: मुंबईत एका महिलेचा मृत्यू; राज्यात कोरोनाचा पाचवा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 8:52 PM

Coronavirus: कस्तुरबा रुग्णालयात महिलेचा मृत्यू; एकाच दिवसात राज्यात कोरोनाचे दोन बळी

मुंबई: एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे. आज दिवसभरात राज्यात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. सकाळी वाशीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आता मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला २३ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.कस्तुरबा रुग्णालयात मृत पावलेल्या महिलेचं वय ६५ वर्ष असून श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा बऱ्याच कालावधीपासून त्रास होता. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं आज तिचा मृत्यू झाला. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. राज्यात कोरोनानं घेतलेला हा पाचवा बळी आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे १२५ रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे आतापर्यंत ७१९ रुग्ण आढळले असून यातले ६२ रुग्ण आज आढळून आहेत. त्यामुळे देशात कोरोना वेगानं हातपाय पसरत असल्याचं दिसून येतंय. कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेतल्यास महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. केरळमधील १३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस