Join us  

Coronavirus:…तर महाराष्ट्रात ‘ही’ वेळ येऊ नये यासाठी वेळीच सावध व्हा; अजित पवारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 1:15 PM

अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतीलंच, परंतु जीवनावश्यक वस्तंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही

ठळक मुद्देराज्यातील रुग्णांची संख्या 112 वर पोहचणं गंभीर आहेनागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थांबावं.उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आवाहन

मुंबई - अमेरिकेनं ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेतली आहे, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची दररोज वाढत असलेली संख्या गंभीर आहे. नागरिकांनी गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नये, काळजी घ्यावी. महाराष्ट्रात ही वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी वेळीच सावध व्हायला हवं अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, देशातील पहिले ‘कौरोना’बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण आज गुढीपाडव्याला ‘कोरोना’मुक्त होऊन घरी परतत आहे त्याचा आनंद आहे. होळीला कोरोनाबाधित ठरलेले हे दोघे आज गुढीपाडव्याला कोरोनामुक्त झाल्याचे सांगून या रुग्णांवर तसेच राज्यातील विविध रुग्णालयात ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभारही मानले

तसेच राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्याची कुठलीही टंचाई नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सरकार सर्वकाळ नियमित ठेवेल, असा विश्वास देतांनाच नागरिकांना खरेदीसाठी गर्दी करु नये, नागरिकांनी खरेदी करताना सुरक्षित अंतराची मर्यादा स्वत:हून पाळावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान, अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतीलंच, परंतु जीवनावश्यक वस्तंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अजित पवारांनी  दिला आहे. सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 5 ने झालेली वाढ आणि राज्यातील रुग्णांची संख्या 112 वर पोहचणं गंभीर आहे. नागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थांबावं. अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडणं टाळावं असंही ते म्हणाले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल माध्यमातून राज्याशी संवाद साधला. कोरोनाच्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र आलाय, त्याचा आनंद घ्या. आपल्या ज्येष्ठांची, मुलाबाळांची काळजी घ्या, ही आपली जबाबदारी आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कोरोनाविरुद्ध लढाई जिंकणारच आहे. संकटावर मात करुन आपल्याला विजयाची गुढी उभारायची आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याअजित पवार