Join us  

...अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट सेंट जॉर्ज रुग्णालयात कॉल; अंध ऑपरेटरला दिली शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 4:50 PM

या वैद्यकीय आणीबाणीत आरोग्याला धोका आहे हे माहित असूनही अशी माणुसकी न सोडता तसेच कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींच्या प्रती आदर वाटतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले

ठळक मुद्दे सर्वांनी खारीचा वाटा उचलला तर मोठ्या लढाया जिंकता येतातमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं हॉस्पिटलमधील टेलिफोन ऑपरेटरचं कौतुक अशा ज्ञात -अज्ञात लोकांमुळे कोरोनाचा हा लढा आपण जिंकू, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

मुंबई - दुपारी साडेबाराची वेळ. सेंट जॉर्ज रुग्णालयात आलेला कॉल नेहमीप्रमाणे राजू चव्हाण यांनी उचलला. टेलिफोन ऑपरेटर म्हणून चव्हाण यांचा नेहमीप्रमाणे हा व्यस्त दिवस होता. त्यात कोरोनामुळे चौकशीसाठी येणाऱ्या दूरध्वनींचे प्रमाणही वाढलेले. पण हा आलेला कॉल होता थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून, राजू चव्हाण यांचे अभिनंदन करण्यासाठी !!

दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले राजू चव्हाण एक दिवसही रजा न घेता गेल्या दोन महिन्यांपासून रोज काम कामावर येतात. आणखी एक शारीरिकदृष्ट्या दिव्यांग ऑपरेटर संदीप शिंदे देखील नियमितपणे मीरा रोड येथून सेंट जॉर्जला पोहचतात आणि कर्तव्य बजावतात. चव्हाण हे दिवसपाळी तर शिंदे हे रात्रपाळीवर असतात. यासंदर्भात वृत्तपत्रांतील बातमीची दखल घेऊन स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोविड योद्धाशी बोलून त्याचे अभिनंदन करायचे ठरवले. त्याप्रमाणे ते चव्हाण यांच्याशी बोलले. मुख्यमंत्री आपले कौतुक करताहेत म्हटल्यावर आश्चर्याचा धक्का बसलेल्या राजू  चव्हाण यांनी त्याही स्थितीत या सगळ्यांचे श्रेय आपल्या वरिष्ठांना दिले आणि मी आपला खारीचा वाटा उचलला असे उद्गार काढले. 

“तुम्ही खूप चांगले काम करता आहात. अशा परिस्थितीत जिथे रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची गरज आहे,तुम्ही दिव्यांग असूनही कुठेही सुट्टी न घेता काम करता हा इतरांसाठी आदर्श आहे. असा सर्वांनी खारीचा वाटा उचलला तर मोठ्या लढाया जिंकता येतात असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ऑपरेटरचे काम करतांना केवळ दूरध्वनी जोडून देणे एवढेच काम आम्ही करीत नाही तर अनेकदा ज्यांचे कॉल येतात ते लोक रुग्णांचे नातेवाईक असतात, गोंधळलेले आणि घाबरलेले असतात. अशावेळी त्यांना आम्ही धीर देतो त्यांना मार्गदर्शन करतो असेही राजू चव्हाण यांनी सांगितले.

ज्ञात अज्ञात कोविड योद्धे

कोरोना काळात मदतीला धावून जाणाऱ्या अनेक लोकांनी वेळप्रसंगी कशाचीही पर्वा न करता काम केले आहे, मदत केली आहे. त्यांनी कुठलीही अपेक्षा देखील व्यक्त केलेली नाही, कसलाही मोबदला त्यांना यासाठी मिळालेला नाही. अशा ज्ञात -अज्ञात लोकांमुळे कोरोनाचा हा लढा आपण जिंकू. विशेषत: मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी विविध आपत्तींमध्ये लोक माणुसकीने इतरांच्या मदतीला धावतात. ही आपत्ती निराळी आहे. या वैद्यकीय आणीबाणीत आरोग्याला धोका आहे हे माहित असूनही अशी माणुसकी न सोडता तसेच कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींच्या प्रती आदर वाटतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महायुतीचं सरकार असताना राष्ट्रवादी भाजपासोबत यायला तयार होती, तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट; भाजपासोबत सरकार बनवायची थेट शरद पवारांची होती ऑफर, पण...

बाबा रामदेव यांच्या पंतजलीकडून ‘कोरोनिल’ लॉन्च; ‘इतक्या’ दिवसांत कोरोना रुग्ण बरा होण्याचा दावा

संभाव्य कोरोनाग्रस्ताचा तडफडून मृत्यू; तब्बल २० तास मृतदेह घराबाहेरच पडून राहिला, त्यानंतर...

...अन् डॉक्टर आमदाराने अनेक किमी पायपीट करुन सीमेवरील सुरक्षा जवानाचे प्राण वाचवले!

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस