Join us  

coronavirus: अ‍ॅन्टिजन टेस्टचा रिपोर्ट खराच असेल असे नाही! मुंबई पालिका आयुक्तांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 4:19 AM

अ‍ॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह असेल आणि तरीदेखील रुग्णामध्ये लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ त्याने आरटी-पीसीआर टेस्ट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर -  मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांनी आज कोरोना संदर्भातील अ‍ॅन्टिजन टेस्टवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अ‍ॅन्टिजन टेस्ट रिपोर्टवर कोणतीच शंका नाही. मात्र, जे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, ते चूक असू शकतात, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.मुंबईहून नागपूरला आलेल्या तज्ज्ञ चमूचे सदस्य असलेल्या चहल यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला आहे. अ‍ॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह असेल आणि तरीदेखील रुग्णामध्ये लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ त्याने आरटी-पीसीआर टेस्ट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. निगेटिव्ह रिपोर्टसंदर्भात ही टेस्ट तेवढीशी खात्रीशीर नाही. पॉझिटिव्ह आलेल्या रिपोर्टमध्ये कोणतीच समस्या नाही. टेस्टची संख्या वाढविण्यापेक्षा त्याच्या गुणवत्तेवर अधिक जोर देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. मृत्यूदर कमी करण्यावर सर्वाधिक जोर देण्याचीही आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.बैठकीमध्ये चहल यांनी आरटी-पीसीआर टेस्ट वाढविण्यावर भर देत, अ‍ॅन्टिजन टेस्टचा उपयोग केवळ गंभीर स्वरूपात आजारी संशयित रुग्णासाठीच करण्यावर मत मांडले. यावेळी त्यांनी शासकीय व खासगी हॉस्पिटल्समध्ये वॉररूम तयार करण्याचे निर्देश दिले. सोबतच तक्रारींचा निपटारा करण्यासाठी, सीसीटीव्ही लावूनच उपचार करण्याचे आवाहन केले. बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त अमितेश कुमार, निवर्तमान पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.मुंबईतल्या परिस्थितीचे अनुभव कथनबैठकीत चमूने आपले अनुभव व्यक्त करताना धारावी आणि मुंबईच्या अन्य भागांमध्ये समन्वयाने काम पार पडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: झोपडपट्टीमध्ये जाऊन स्थितीचा अंदाज घेतला. त्यामुळे, परिस्थिती आटोक्यात आणण्यास मदत मिळाली. नागपुरातही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दौरा करण्याची गरज आहे. ज्या पॉझिटिव्ह रुग्णांकडे वेगळे स्वच्छतागृह नाही किंवा कमी जागा आहे, त्यांच्या नातेवाईकांनाही क्वारंटाइन करावे लागेल.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमुंबई महानगरपालिका