Join us  

CoronaVirus news : मोदी सरकारच्या गाइडलाइनमधल्या गोंधळानं देशात कोरोना वाढतोय; अमोल कोल्हेंचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 9:26 AM

ठाकरे सरकारकडे अनेकांनी बोट दाखवलेलं असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी थेट मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

ठळक मुद्दे ठाकरे सरकारकडे अनेकांनी बोट दाखवलेलं असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी थेट मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.पहिला लॉकडाऊन झाला, त्यावेळी आपल्याकडे ५०० ते ५५० एवढेच रुग्ण होते. पहिला लॉकडाऊन जेव्हा संपला तेव्हा आपण १० हजारांचा टप्पा ओलांडला होता. केंद्र सरकारच्या गाइडलाइनमध्ये एक धरसोडवृत्ती पाहायला मिळतेय. मागच्या लॉकडाऊनमध्ये दोन-अडीच दिवसांनंतर एक नवीन सूचना येत होती.

मुंबईः देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला असून, केंद्राबरोबर राज्य सरकार त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एवढं असूनही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारकडे अनेकांनी बोट दाखवलेलं असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी थेट मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अमोल कोल्हे म्हणतात, पहिला लॉकडाऊन झाला, त्यावेळी आपल्याकडे ५०० ते ५५० एवढेच रुग्ण होते. पहिला लॉकडाऊन जेव्हा संपला तेव्हा आपण १० हजारांचा टप्पा ओलांडला होता. दुसरा लॉकडाऊन संपला तेव्हा आपण जवळपास २५ ते ३० हजारांचा टप्पा ओलांडला होता. आजच आपण ७५ हजारांच्या घरात आहोत आणि १७ तारखेपर्यंत कदाचित आपण ८० हजारांचा टप्पा ओलांडू, असा अंदाज वाटतोय. 

जर कम्युनिटी स्प्रेड थांबवण्यासाठी हा लॉकडाऊन होता, तर आपल्याला किती यश मिळालं हा आत्मपरीक्षणाचा भाग आहे. पायाभूत सुविधा तयार करण्यात महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. केंद्र सरकारच्या गाइडलाइनमध्ये एक धरसोडवृत्ती पाहायला मिळतेय. मागच्या लॉकडाऊनमध्ये दोन-अडीच दिवसांनंतर एक नवीन सूचना येत होती. दर दोन दिवसांनी जेव्हा सूचना बदलायला सुरुवात होते, तेव्हा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेमध्ये गोंधळ उडतो, असं म्हणत कोल्हेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  

लॉकडाऊनचा दुसरा टप्पा महाराष्ट्र सरकारनं व्यवस्थित पूर्ण केला, पण देशपातळीवर तो कशा पद्धतीनं पूर्ण झालाय, यासंदर्भात संभ्रमाचं वातावरण आहे. जर्मनी दर १० लाखांच्या मागे २५ हजार चाचण्या घेतंय, न्यूझीलंड २२ हजार चाचण्या करतंय. पेरूसारखा देश ५ हजार टेस्टिंग करतोय. तिथे भारताचं टेस्टिंग हे ५०० ते ६००च्या दरम्यान आहे. मग हा प्रश्न पडतोच की आपण नक्की कोणाला फसवतो आहोत. आपण फक्त स्वतःला फसवतो आहोत की, आपण जगाला फसवतो आहोत. 

कोरोनावर आम्ही कसं नियंत्रण मिळवतोय हे जगाला दाखवण्यासाठी जर आपण असं करत असू, तर ती चूकच आहे. ८० हजारांच्या घरात पोहोचल्यानंतर मजुरांना त्यांच्या राज्यांत पाठवण्यासाठी ट्रेन आणि सुरू करतोय, मग आपल्या पॉलिसीमध्ये गडबड झाली की नाही हे शोधावं लागेल.  केंद्राकडून सुस्पष्ट धोरण अद्याप मांडण्यात आलेलं नाही. सुस्पष्ट धोरणाचा अद्यापही अभाव आहे. स्वदेशी, लोकलवोकल या पंतप्रधानांच्या आवाहनांचं मी नक्कीच स्वागत करतो. पण हे सगळं कागदावर न राहता सर्वसामान्यांना त्याचा काय फरक पडणार आहे हे जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला समजत नाही. तोपर्यंत त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार नाही. लॉकडाऊन आणि टेस्टिंगच्या बाबतीत महाराष्ट्र आज अव्वल नंबरला आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्र आज अव्वल नंबरला आहे. असं असतानाही केंद्राकडून सातत्यानं होणारे बदल आणि गाइडलाइनमध्ये सुस्पष्टता नसल्यामुळे हा संभ्रम निर्माण होतोय आणि तो संभ्रम नक्कीच आहे. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार चांगलं काम करतंय, असं म्हणत सरकार अस्थिर करणाऱ्यांनाही त्यांनी चपराक लगावली आहे.  

टॅग्स :नरेंद्र मोदीकोरोना वायरस बातम्याभाजपाकेंद्र सरकार