Join us  

coronavirus: कोरोनाच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी साधणार संवाद

By बाळकृष्ण परब | Published: February 21, 2021 12:42 PM

Chief Minister Uddhav Thackeray will address the people of the Maharashtra today : देश आणि राज्यावर आलेले कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्याची चिन्हे असतानाच आता राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. :

मुंबई - देश आणि राज्यावर आलेले कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्याची चिन्हे असतानाच आता राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. (increase in coronavirus patients in Maharashtra) त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. आता कोरोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. (Chief Minister Uddhav Thackeray will address the people of the Maharashtra today )

कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी वारंवार संवाद साधून मार्गदर्शन आणि धीर देण्याचे काम केले आहे. मु्ख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला सुरुवातीपासूनच जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यामध्येही यश मिळाले होते. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई, पुण्यासारख्या शहरात रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

त्यादरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधून परिस्थितीतीबाबत माहिती देणार आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ७ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री कोरोनाला रोखण्यासाठी कोणती मोठी घोषणा करतात. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी कुठली नवी नियमावली जाहीर करतात याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या सहा हजार २८१ रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील सलग दुसऱ्या दिवशी सहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली.

आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी सापडलेल्या ६ हजार २८१ रुग्णांपैकी १७०० रुग्णांपेक्षा अधिक किंवा २७ टक्के रुग्ण हे मुंबई आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. राज्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाख, ९३ हजार ९१३ एवढी झाली आहे. तर ४० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून ५१ हजार ७५३ झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ४८ हजार ४३९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेमहाराष्ट्र