Join us  

coronavirus: दिलासादायक! राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचे प्रमाण घटले, तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 9:43 PM

आज राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत २२५९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी १०१५ रुग्ण मुंबईत सापडले आहेत. तर राज्यात दिवसभरामध्ये सुमारे १२० रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देआज राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत २२५९ नव्या रुग्णांची भर दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४२ हजार ६३८ झाली आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आजही राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत २२५९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी १०१५ रुग्ण मुंबईत सापडले आहेत. तर राज्यात दिवसभरामध्ये सुमारे १२० रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.तसेच आज तब्बल १६६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४२ हजार ६३८ झाली आहे. 

आज राज्यात २२५९ नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९० हजार ७८७ झाली आहे. तर आज दिवसभरात १२० रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२८९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये ५१ हजार १०० कोरोनाचे रुग्ण सापडले असून, १७६० जणांचा मृत्यू झाला आहे.  राज्यात आतापर्यंत ४२ हजार ६३८ जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्या राज्यात ४४ हजार ८४९ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

राज्यात आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या ५ लाख ७७ हजार ८११ नमुन्यांपैकी ९० हजार ७८७ नमुने पॉझिटिव्ह (१५.७१ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६८ हजार ०७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात संस्थात्मक  क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ९३० खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ४७० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ८३ (मुंबई ५८, ठाणे १३, मीरा-भाईंदर ६, पनवेल ३, नवी मुंबई १, वसई-विरार २), नाशिक- ३ (नाशिक ३), पुणे- १८ (पुणे १६, सोलापूर २), कोल्हापूर- १ (रत्नागिरी १),औरंगाबाद-१० (औरंगाबाद १०), अकोला -३ (अकोला २, अमरावती १), नागपूर-१ (नागपूर १), इतर राज्य-१ (मध्ये प्रदेशातील एका व्यक्तीचा मृत्यू नागपूरमध्ये झाला आहे.)

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८० पुरुष तर ४० महिला आहेत.आज नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६२ रुग्ण आहेत तर ४७  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ९१ जणांमध्ये ( ७५.८ %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३२८९ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  ११ मे ते ६ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७१ मृत्यूंपैकी मुंबई ४५, ठाणे -११,मीरा भाईंदर -६, औरंगाबाद – ३, पनवेल -२, नाशिक -१, रत्नागिरी -१, वसई विरार -१ व इतर राज्यातील १ मृत्यू आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्रमुंबई