मुंबई : कोरोनाबाधितांच्या संख्येने गुरुवारी नवा उच्चांक गाठला. राज्यात एकाच दिवशी १,६०२ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या २७,५२४ झाली आहे. दिवसभरात ४४ कोरोनाबाधितांना जीव गमवावा लागला. तर ५१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण ६ हजार ५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.आज दिवसभरात मृत्युमुखी पडलेल्या ४४ कोरोनाबाधितांमध्ये ३१ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे. या ४४ मृत्यूंपैकी २१ जणांचे वय साठ वर्षांहून अधिक होते. २० जण चाळीस ते साठ या वयोगटातील होते. तर, तिघांचे वय ४० वर्षांखालीआहे.आज ४४ मृतांपैकी ३४जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १०१९ इतकी झाली आहे. आजच्या ४४ मृत्यूपैकी मुंबईमधील २५, नवी मुंबईत १०, पुण्यात ५, औरंगाबाद शहरात २, पनवेल आणि कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील दहा मृतांचा आकडा हा मागील महिनाभरातील आहे.आतापर्यंत प्रयोगशाळेत पाठविलेल्या २ लाख ४० हजार १४५ नमुन्यांपैकी २ लाख १२ हजार ६२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १ हजार ५१२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४ हजार २५३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५९.०४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
coronavirus: राज्यात १६०२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद, एकूण रुग्णांची संख्या २७,५२४
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 06:47 IST