Join us  

CoronaVirus : धोका वाढला! मुंबईत मागील २४ तासांत १०३ नवे कोरोना रुग्ण; परिस्थिती गंभीर, सुरक्षित राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 11:03 PM

३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत तपासणी झालेल्या आणि पॉझिटिव्ह आलेल्या ५५ रुग्णांचाही समावेश आहे. मुंबईतील बळींची संख्याही ३० वर पोहोचली आहे.

मुंबई – शहर उपनगरातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतेय. कोरोना विषाणूचा हा वाढता फैलाव प्रशासनासमोर नवे आव्हान निर्माण करणारा आहे. मागील २४ तासांत १०३ नव्या कोरोना रुग्णांचे निदान शहर-उपनगरात झाले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नवे १०३ 'कोरोना'  पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत तपासणी झालेल्या आणि पॉझिटिव्ह आलेल्या ५५ रुग्णांचाही समावेश आहे. मुंबईतील बळींची संख्याही ३० वर पोहोचली आहे.

पालिकेच्या विविध रुग्णालयात आठ जणांचा मृत्यू झाला. या आठ मृत्यूंपैकी सहा जणांना दीर्घकालीन आजार होता आणि दोन जण ज्येष्ठ नागरिक होते.  तीन जणांचा मृत्यू अहवाल हा ३१ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीमधील आहे. त्यामुळे २५ जानेवारीपासून आतापर्यंत महामुंबईत एकूण ४३३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर रविवारी २० जण झाले कोरोनामुक्त झाल्याचे अहवालात म्हटले आहे तर आतापर्यंत एकूण ५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पालिकेच्या माध्यमातून अशा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांवर देखरेख ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.........................

केईएममध्ये रविवारी मृत्यू, बळींची संख्या ३० वर

केईएम रुग्णालयात रविवारी ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे, त्याने परदेशी प्रवास केला नव्हता. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३० वर पोहोचली आहे. कस्तुरबा रुग्णालयात डोंबिवली  येथील ६७ वर्षीय महिलेचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. तिने परदेश प्रवास केलेला नव्हता. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते. कस्तुरबा रुग्णालयात एका ६४ वर्षीय पुरुषाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.  नायर रुग्णालयात  ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.  कस्तुरबा रुग्णालयात ५२ वर्षीय पुरुषाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.त्याला उच्च रक्तदाब , मधुमेह  या आजारासोबत तो एचआयव्ही बाधितही होता.  केईएम रुग्णालयात ७० वर्षीय महिलेचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. तिने परदेश प्रवास केलेला नव्हता. तिला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा जुनाट आजार होता त्यामुळे ती डायलिसीसवर होती. चेंबूर येथील खासगी  रुग्णालयात एका ५५ वर्षीय पुरुषाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केला नव्हता तथापि तो टॅक्सी ड्रायव्हर असल्याने अनेकदा तो प्रवासी वाहतूकीसाठी विमानतळावर येत - जात असे. कस्तुरबा रुग्णालयात ७७ वर्षीय पुरुषाचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.त्याला उच्च रक्तदाब , मधुमेह  हे आजार होते. चेंबूर येथील खासगी रुग्णालयात ८० वर्षीय पुरुषाचा काल पहाटे मृत्यू झाला.  या रुग्णाने परदेश प्रवास केलेला नव्हता. या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, अपस्मार अशा व्याधी होत्या. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झालेला होता.  करोना बाधित रुग्णाची निकट सहवासित असलेल्या ६० वर्षीय महिलेचा काल मध्यरात्री पुण्याच्या ससून रुग्णालयात मृत्यू झाला. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही होते. पुण्याच्या ससून रुग्णालयात ५२ वर्षाच्या एका पुरुषाचा मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नाही. त्याला मधुमेहाचा त्रास होता. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी ५८ वर्षाच्या बॅंक अधिका-याचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय्रोगाचा त्रास होता. नजीकच्या काळात मुंबई वगळता त्यांनी कोठेही प्रवास केलेला नव्हता.  जिल्हा रुग्णालय औंध पुणे येथे रविवारी ७७ वर्षीय आत्यंतिक स्थूल असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. तिची पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. शहरातील खासगी रुग्णालयाने तिला संदर्भित केले होते. 

..................

५ एप्रिलची आकडेवारी

बाह्य रुग्ण विभागात केलेली तपासणी             १५०

एकूण भरती झालेले संशयित रुग्ण               ७२

एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण                        १०३

डिस्चार्ज केलेले रुग्ण                          २०

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस