Join us  

रखडलेल्या ८७ हजार घरांच्या बांधकामाला चालना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 6:24 PM

Construction started : स्वामी फंडातील अर्थसहाय्यामुळे प्रकल्पांची कामे सुरू

 

मुंबई : कोरोना संक्रमण आणि बांधकाम व्यावसायिकांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे रखडलेल्या प्रकल्पांना केंद्र सरकारने स्पेशल विंडो फाँर अफोर्डेबल अँण्ड मिड  इनकम हाऊसिंग फंडातून (स्वामी) अर्थसहाय्य देण्यास सुरूवात केली आहे. १३६ प्रकल्पांना कर्ज मंजूर झाले असून त्यापैकी ३६ ठिकाणी कर्ज वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे सुमारे ८७ हजार रखडलेल्या घरांचे बांधकाम सुरू झाले असून त्यात गुंतवणूक करणा-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्यम आकाराच्या आणि परवडणा-या घरांच्या प्रकल्पांमध्ये जर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी नोव्हेंबर, २०१९ मध्ये केंद्र सरकारने स्वामी फंड उभारण्यास मान्यता दिली होती. कोरोना संकट काळात हा निधी अंतिम टप्प्यात रखडलेल्या काही प्रकल्पांसाठी वरदान ठरला आहे. पहिल्या टप्प्यात किमान २५ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर होईल अशी अपेक्षा आहे. त्यापैकी सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याला मंजूरी देण्यात आली आहे. अर्थसहाय्यासाठी ३५० पेक्षा जास्त प्रकल्पांचे अर्ज सरकारकडे दाखल झाले आहेत. मंजूरी मिळालेल्यांपैकी ३६ प्रकल्पांसाठी प्रत्यक्ष निधी उपलब्ध झाला असून त्यांचे काम सुरू झाल्याची माहिती हाती आली आहे. सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील चार आणि ठाणे पुण्यातील प्रत्येकी एक प्रकल्पाचा समावेश आहे.

बोरिवली येथील सीसीआय प्रकल्पाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले असून हवालदिल झालेल्या गुंतवणुकदारांच्या तक्रारी आणि परताव्याची मागणी करणा-या याचिका महारेराकडे दाखल होत आहेत. या प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यामुळे रखडलेले उर्वरित काम येत्या काही महिन्यांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. याच धर्तीवर अन्य प्रकल्पसुध्दा मार्गी लागतील आणि तिथे गुंतवणूक करणा-या कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :बांधकाम उद्योगमुंबई