Join us  

काँग्रेस चालेल, पण राष्ट्रवादीसोबत कधीच युती नाही, प्रकाश आंबेडकरांनी सांगितले 'हे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 3:35 PM

भारिप बहुजन महासंघाने आगामी निवडणुकांसाठी एआयएमआयएमसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकाही करण्यात आली. मात्र

मुंबई - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषेत काँग्रेसचे कौतूक करताना राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली आहे. काँग्रेससोबत युती करायची आमची इच्छा आहे, पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापी एकत्र येऊ शकत नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. कारण, भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच यावेळी नेहमीप्रमाणे संघ परिवार आणि मोहन भागवत यांच्यावर टीकाही केली.  

भारिप बहुजन महासंघाने आगामी निवडणुकांसाठी एआयएमआयएमसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र, आपल्या या निर्णयाचे समर्थन करताना आंबेडकरांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार हे धर्मनिरपेक्ष आहेत, पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. त्यांच्याच पक्षातील उदयनराजे भोसले संभाजी भिडेंचे जाहीरपणे कौतूक करतात. त्यामुळे आम्ही कदापी राष्ट्रवादीसोबत युती करु शकत नाही. 2014 च्या निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते. राष्ट्रवादीने आमदारांच्या दबावाखाली सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जाण्यात आम्हाला अडचण आहे. तसेच भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये आहेत. उदयनराजे हे भिडेंची बाजू मांडतात मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार ? असा प्रश्न उपस्थित करत आंबेडकर यांनी भारिप आणि एमआयएमच्या युतीचे समर्थन केले आहे. दरम्यान, काँग्रेसबरोबर आम्हाला युती करायची आहे. निवडणुकांतील अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत, पण काँग्रेसच्या मित्रांबरोबर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं. तर एमआयएमसोबत युती करणार, निवडणूक लढवणार, आता मागे फिरणार नाही, असेही आंबेडकर यांनी ठामपणे सांगितले. 

टॅग्स :प्रकाश आंबेडकरराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार