Join us  

काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरातांनी संजय राऊतांना फटकारलं; अर्धवट माहिती घेऊन अग्रलेख लिहिण्यापेक्षा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 4:12 PM

जनतेच्या हिताचे मुद्दे घेऊन आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सर्व समस्या सुटतील अशी अपेक्षा आहे. अद्याप आम्हाला वन टू वन वेळ मिळाली नाही पण लवकरच आमची भेट होईल असं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं आहे.

ठळक मुद्देशरद पवार हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे मार्गदर्शन सरकारसाठी आवश्यक जनतेच्या हिताचे मुद्दे घेऊन आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे. अद्याप आम्हाला वन टू वन वेळ मिळाली नाही पण लवकरच आमची भेट होईल

मुंबई – राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अशातच सामना अग्रलेखातून काँग्रेसवर करण्यात आलेल्या टीकेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही समाचार घेतला आहे. अपूर्ण माहितीच्या आधारे अग्रलेख लिहिण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संपूर्ण चांगली माहिती घेऊन पुन्हा अग्रलेख लिहावा असं थोरातांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

याबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की, अपूर्ण माहितीवर अग्रलेख लिहिला आहे, शिवसेनेचे मुखपत्र आहे पण माहिती पूर्ण घेऊन अग्रलेख लिहावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन पुन्हा चांगला अग्रलेख लिहावा. आमची भूमिका समजल्यानंतर मुख्यमंत्री समाधानी होतील. व्यवस्थित माहिती घेऊन अग्रलेख लिहायला हवा होता. राज्याच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेणे अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच शरद पवार हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे मार्गदर्शन सरकारसाठी आवश्यक आहे. सामना अग्रेलख लिहिताना काही माहिती घेतली नाही आणि अग्रलेख लिहिला. जनतेच्या हिताचे मुद्दे घेऊन आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सर्व समस्या सुटतील अशी अपेक्षा आहे. अद्याप आम्हाला वन टू वन वेळ मिळाली नाही पण लवकरच आमची भेट होईल, काही मुद्दे चर्चेनंतर सुटतील अशी अपेक्षा बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

सामना अग्रलेखात काय लिहिलं होतं?

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, असा इशारावजा सल्ला देण्यात आला आहे.

सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे ठरले. स्वत: शरद पवार यांनी हे पथ्य पाळले आहे. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे, असा सल्ला देताना काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे. 

टॅग्स :काँग्रेसशिवसेनाउद्धव ठाकरे