मुंबई - मदर डेअरीमध्ये हजाराहून अधिक झाडे असून त्यातील काही शंभर ते दीडशे वर्षे जुनी आहेत. त्या झाडांची कत्तल सुरू असून यामुळे मुंबईच्या पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर ही जमीन अदानीला देऊ नये, या मागणीसाठी मुंबई कॉँग्रेसतर्फे रविवारी नेहरूनगर ते कुर्ला मदर डेअरीपर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये सर्वसामान्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, अदानी हे राज्य सरकारचे ‘आका’ आहेत. हे सरकार पोलिस यंत्रणेचा वापर करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते.
आवाज दडपण्याचा प्रयत्न! जमीन लुटीविरोधात आम्ही लोकशाही मार्गाने शांततेत निदर्शने करत आहोत. मात्र, लोकांचा आवाज दडपण्यासाठी येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा पाठवून आमचं शांततापूर्ण आंदोलन रोखण्यात आलं आहे, पण आम्ही डगमगणार नाही, असेही त्या म्हणाल्यामुंबईच्या हक्कासाठी, मुंबईकरांच्या भविष्यासाठी या ‘अदानी’ सरकारविरुद्ध लढत राहू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या निर्णयानंतर पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे, याबाबत कोणताही अभ्यास करण्यात आलेला नाही. यामुळे फक्त कुर्ल्यातीलच नाही तर संपूर्ण मुंबईचे नुकसान होणार आहे, असे मत खा. गायकवाड यांनी व्यक्त केले.