Join us  

शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही वाढवलं भाजपाचं टेन्शन; मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 3:54 PM

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तेवरून पुन्हा एकदा चढाओढ पाहायला मिळतेय.

मुंबईः विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तेवरून पुन्हा एकदा चढाओढ पाहायला मिळतेय. भाजपाला 105 जागा मिळाल्या असून, शिवसेनेचा 56 जागांवर विजय मिळाला आहे. त्यानंतर शिवसेनेनं अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील वाटा वाढवण्यासाठी भाजपावर दबाव वाढवला आहे. त्यातच काँग्रेसनंही शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची खुली ऑफर दिली आहे. काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेनं प्रस्ताव दिल्यास काँग्रेस पाठिंबा देण्याचा विचार करेल, असे सूतोवाच केले आहेत.आम्ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार आहोत, पण जर शिवसेनासोबत सत्ता स्थापनेसाठी पर्यायावर चर्चा करायची असेल, तर शिवसेना आमच्याकडे यायलाच हवी, त्यांनी अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही. शिवसेनेच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या भाजपाच्या मागणीवरून ते म्हणाले, चेंडू आता भाजपाच्या कोर्टात आहे. आता शिवसेनेनं ठरवायचं आहे की शिवसेनेला पाच वर्षांचा मुख्यमंत्रिपद हवं की भाजपाबरोबर अडीच अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद वाटून घ्यायचं आहे. जर शिवसेनेनं आमच्याकडे सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव पाठवला, तर आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी यासंदर्भात चर्चा करू, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.तर दोन दिवसांपूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी सेनेनं प्रस्ताव दिल्यास पाठिंबा देऊ, असं म्हटलं होतं. भाजप-शिवसेना यांचे पाच वर्ष जमले नाही. मात्र, तरी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची युती झाली. मात्र, आज काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण बनू शकते, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. थोरात म्हणाले, या समीकरणासाठी आम्हाला वरिष्ठांकडून मान्यता घ्यावी लागेल.परंतु शिवसेनेने प्रथम मन बनविले पाहिजे. भाजपच्या प्रभावाखाली रहायचे नाही, त्यांना घाबरायचे नाही. हे आता त्यांनी ठरविले पाहिजे. यासाठी वरिष्ठ पातळीवर  आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत. गेल्या तीन महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने मला संगमनेर विधानसभा मतदारसंघात वेळ देता आला नाही.  

टॅग्स :काँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019