Join us  

आरक्षणावरून मराठ्यांच्या मनात संभ्रम- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 1:45 PM

मराठा समाजाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे, असे अजित पवार म्हणाले.

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे. यावेळी त्यांनी सरकारवर आगपाखड केली आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून वेगवेगळी मते मांडली जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे, असे अजित पवार म्हणाले. तसेच जल्लोष कधी करायचा, कशाचा करायचा तेही मुख्यमंत्र्यांनी सांगावं, असं अजित पवार म्हणाले आहे.तसेच मुस्लिम आरक्षणाबाबत सरकारकडून काहीही हालचाली होत नसल्याचं ते म्हणाले आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावर त्यांनी संपूर्ण अहवाल स्वीकारला नसल्याचं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. अहवालातील जवळपास सर्वच शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत. कायदेतज्ज्ञांच्या सल्लानुसार मराठा आरक्षणासंदर्भात कायदा केला जाईल. आपल्याला समाज एकत्र आणायचा आहे की भांडणं लावायची आहेत, असाही प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.  

तर छगन भुजबळ यांनी विविध मर्यादांमुळे आता ओबीसींकडे केवळ १७ टक्केच आरक्षण उरले असल्याचे सांगत मराठ्य़ांचा समावेश एसईबीसीमध्ये केल्याने त्यांचाही भार ओबीसीं प्रवर्गावर पडू शकतो, अशी भीती व्यक्त केली. तसेच आरक्षाणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करून मर्यादा वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली. तर ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाबाबतचे अहवाल सभागृहात मांडण्यास हरकत काय, असा सवाल केला. 

टॅग्स :अजित पवार