Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कंगनाला नुकसान भरपाई द्या, BMC मधील अधिकाऱ्यांवर कारवाई करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 17:33 IST

कंगनाच्या भेटीनंतर आठवलेंनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळ, कंगनाला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही कोश्यारी यांनी केली

ठळक मुद्देआज राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. अभिनेत्री कंगना राणौतच्या कार्यालयावर मुंबई मनपाने केलेल्या कारवाईमुळे कंगनावर अन्याय झाला आहे. त्यामुळे, कंगनाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.

मुंबई - शिवसेना विरुद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत वादात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. कंगना बुधवारी मुंबईत आल्यानंतर तिने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत, तिच्या कार्यालयावरील कारवाईचा संताप व्यक्त केला. शिवसेना-कंगना वाद जोर धरत असतानाच रामदास आठवले कंगनाच्या भेटीला तिच्या घरी गेले. मुंबईतील ऑफिस तोडल्याप्रकरणी आणि मुंबईत सुरक्षा दिल्यानंतर आठवलेंनी तिच्याशी चर्चा केली. त्यानंतर, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत कंगनावर अन्याय झाल्याची खंत व्यक्त केली.  

गुरुवारी कंगना आणि रामदास आठवले यांच्या तब्बल 1 तास चर्चा झाली. त्यामध्ये सुशांतसिंह राजपूत प्रकरणापासून ते मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी, रामदास आठवेंली घरी येऊन भेट घेतल्याबद्दल तिने आभार मानले. तसेच, आपण माझ्या घरी आलात हे माझे सौभाग्य आहे, आपले आशीर्वाद मला हवेत. आपण आमच्या हिमाचलमधील घरी यावे, आपला पाहुणचार करायची संध्या द्यावी, असे कंगनाने म्हटले. तसेच, डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाचा मला अभिमान असल्याचेही कंगना म्हणाली. तर, रिपाइं तुमच्या पाठिशी असल्याचे आठवलेंनी आश्वस्त केलं. 

कंगनाच्या भेटीनंतर आठवलेंनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळ, कंगनाला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही कोश्यारी यांनी केली. ''आज राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. अभिनेत्री कंगना राणौतच्या कार्यालयावर मुंबई मनपाने केलेल्या कारवाईमुळे कंगनावर अन्याय झाला आहे. त्यामुळे, कंगनाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, आणि चुकीच्या पद्धतीने कारवाई करणाऱ्या दोषी मनपा आधिऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, यासंदर्भात चर्चा केली, असे ट्विट आठवले यांनी केले आहे.

कंगनालाही राजकीय पार्श्वभूमी 

कंगनालाही राजकीय पार्श्वभूमी आहे. तिचे पणजोबा सरजू सिंह गोपालपूरचे आमदार होते. त्या आधीपासून त्यांचे कुटुंबीय काँग्रेसी विचारधारेचे समर्थ राहिले आहे. मात्र, कंगना गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करते. यामुळे कंगना पुढील काळात भाजपात दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. तिच्या आईनेही आज तसेच संकेत दिले आहेत. शांता कुमार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून कंगनाला सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे. 

कंगना २ कोटींचा दावा ठोकणार 

अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई महापालिकेने ऑफिस तोडल्य़ानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही या वादात ओढले आहे. तसेच आता महापालिकेवर गुन्हा दाखल करण्याच्या विचारात असल्याचे तिचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने उचललेल्या पावलावरून कंगना नाराज असून ते ऑफिस तिच्यासाठी स्वप्नांचे ऑफिस होते. वकिलाने हे देखील सांगितले की, महापालिकेने ही कारवाई कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेली आहे. कंगनाच्या ऑफिसचे जेवढे नुकसान झाले आहे त्याची एकूण रक्कम 2 कोटींच्या घरात जाते. तसेच कंगनाने उच्च न्यायालयात बीएमसीने बेकायदा कारवाई केल्याचे अॅफिडेव्हीट दिले आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्याविरोधात कारवाई करणार असे तिचे म्हणणे आहे. आज तकने सिद्दीकी यांची मुलाखत घेतली आहे.

टॅग्स :कंगना राणौतरामदास आठवलेभगत सिंह कोश्यारीशिवसेना