मुंबई: बेस्ट समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीतमध्ये बोनस जाहीर करताना अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. यादरम्यान सध्या सुरु असलेल्या किमान पाच रुपयांच्या तिकिट दरात भाडेवाढ सुचवली नसल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बेस्टच्या नवीन अर्थसंकल्पात प्रवासी किमान भाड्यांमध्ये वाढ होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र बेस्टने नवीन जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ करण्यासंदर्भात नमूद करण्यात आले नाही. त्यामुळे मुंबईकरांचा पाच रुपयातील बेस्ट प्रवास सुरु राहणार आहे.
बेस्टच्या तिकिटांच्या दरात मोठी कपात केल्यामुळे प्रवासी संख्या वाढली खरी. मात्र भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसगाड्या आणि भाडेकपातीचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात सुमारे दोन हजार २४९ कोटींहून जास्त अंदाजित तूट दाखविण्यात आली आहे. त्यामुळे सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात तब्बल २२५० कोटी रुपयांची तूट बेस्ट उपक्रमाला सहन करावी लागणार आहे.