दोन वर्षांत सागरी किनारे होणार निर्मळ, २०२८ पर्यंत सातही 'एसटीपी' पूर्ण क्षमतेने कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 11:52 IST2026-03-02T11:50:39+5:302026-03-02T11:52:12+5:30
मुंबईच्या मलजल वाहिन्यांतील दूषित सांडपाणी समुद्रात जाऊ नये यासाठी पालिकेकडून ७ एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया केंद्रे) स्थापन करण्यात आली आहेत.

दोन वर्षांत सागरी किनारे होणार निर्मळ, २०२८ पर्यंत सातही 'एसटीपी' पूर्ण क्षमतेने कार्यरत
मुंबई :
मुंबईच्या मलजल वाहिन्यांतील दूषित सांडपाणी समुद्रात जाऊ नये यासाठी पालिकेकडून ७ एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया केंद्रे) स्थापन करण्यात आली आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात ५ हजार ६९० कोटींची आर्थिक तरतूद केली असून, ही सातही केंद्रे २०२६ ते २०२८ च्या दरम्यान पूर्णपणे कार्यान्वित होतील, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईची पाण्याची दररोजची गरज ४५०० दशलक्ष लिटर असून, उपलब्ध पाणीपुरवठा हा ३,८३० दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे अंदाजे ६७० दशलक्ष लिटर पाण्याची तूट आहे. भविष्यात ही तूट आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यापैकी २४६४ दशलक्ष लिटर म्हणजे ८० ते ९० टक्के भाग सांडपाण्याच्या रूपाने समुद्रात सोडला जातो. या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते वाचविण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे.
मलजल बोगदे
मिठी नदी मलजल बोगदा ९६.४० टक्के काम पूर्ण
वर्सोवा मलजल बोगदा ९८ टक्के काम पूर्ण
प्राधान्य मलजल बोगदा १ (बोरिवली ते मालाड आंतरप्रवाही) ८१. टक्के काम पूर्ण
प्राधान्य मलजल बोगदा २ (गोरेगाव ते नवीन मालाड) ५९.३० टक्के काम पूर्ण
या सात एसटीपी केंद्राशिवाय मुंबई मलनि:सारण प्रकल्प विभागाकडून ४ मलजल बोगदे आणि मलजल उदंचन केंद्राची कामेही सुरू आहेत.
या ठिकाणी आहेत महापालिकेची मलनि:सारण केंद्रे
मुंबईत सध्या वरळी, वांद्रे, मालाड, घाटकोपर, धारावी, भांडुप, वर्सोवा अशा ७ ठिकाणी एसटीपी केंद्रे कार्यरत आहेत. या प्रकल्पांतून दररोज २,४६४ दशलक्ष लिटर पाण्यावर तृतीय स्तरावरील प्रक्रिया करून ५० टक्के पाणी पिण्यायोग्य करण्यात येणार आहे.
असे होणार प्लांटचे काम
सातही एसटीपी प्लांटचे काम वेगाने सुरू असून, त्यांच्या नियोजित वेळेपूर्वी ते पूर्ण होईल. धारावी प्रकल्पातून ४१८ एमएलडी, वरळी प्रकल्पातून ५०० एमएलडी, वांद्रे येथून ३६० एमएलडी, वर्सोवा प्रकल्पातून १८० एमएलडी, मालाडमधून ४५४ एमएलडी, घाटकोपर प्रकल्पातून ३३७ एमएलडी आणि भांडुप 'एसटीपी'तून २१५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाऊन ते स्वच्छ केले जाईल.
सात एसटीपी केंद्रांच्या कामाची प्रगती
भांडुप: ६९.१९ % (ऑगस्ट २०२६)
वर्सोवा: ५९.७२ % (जुलै २०२६)
घाटकोपर: ५२.५० % (जुलै २०२६)
वांद्रे: ५२.७० % (जुलै २०२७)
वरळी: ४९.५० % (जुलै २०२७)
धारावी: ६०.४८ % (जुलै २०२७)