रडार क्षमतेतील वाढीसह जहाज संख्या वाढल्याने तटरक्षक दल अधिक सक्षम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 02:52 IST2019-11-02T02:51:43+5:302019-11-02T02:52:06+5:30
विजय चाफेकर; वसई, मुरुड व रत्नागिरीमध्ये नवीन रडार यंत्रणा बसविणार

रडार क्षमतेतील वाढीसह जहाज संख्या वाढल्याने तटरक्षक दल अधिक सक्षम
मुंबई : भारतीय तटरक्षक दलामध्ये येत्या दोन वर्षांत १७ अत्याधुनिक जहाजे सामील होतील, तसेच १७ ठिकाणी रडार लावण्यात येतील. यामुळे तटरक्षक दलाच्या शक्तीमध्ये व क्षमतेमध्ये मोठी वाढ होऊन तटरक्षक दल अधिक सक्षम होईल, असा विश्वास तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे नवनियुक्त अतिरिक्त महासंचालक विजय चाफेकर यांनी व्यक्त केला. चाफेकर यांनी शुक्रवारी सकाळी वरळी येथील तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाच्या मुख्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी जनसंपर्क अधिकारी व्ही. के. सिंग उपस्थित होते.
सध्या तटरक्षक दलाच्या ताफ्यातील रडारमध्ये वाढ करण्यात येत असून, आणखी १७ रडार बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी वसई, मुरुड व रत्नागिरी येथे नवीन रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा लाभ होईल व इलेक्ट्रॉनिक्स निरीक्षणामध्ये अधिक अचूकता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मच्छीमार समाजाच्या जास्तीतजास्त तरुणांनी तटरक्षक दलात प्राधान्याने सामील होण्यासाठी तटरक्षक दलाकडून प्रोत्साहन देण्यात येत असून, प्रशिक्षण व इतर साहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. मच्छीमार बोटींवरील खलाशांकडे जीवनरक्षक जॅकेटची संख्या अनेकदा कमी असते. जीवरक्षक जॅकेट समुद्रात जाताना अत्यंत आवश्यक आहे, याची जाणीव मच्छीमारांना होणे गरजेचे आहे. आणीबाणीच्या प्रसंगी काय करावे, याबाबतदेखील तटरक्षक दल मच्छीमारांना प्रशिक्षण देत आहे. क्यार चक्रीवादळामध्ये चार दिवस अगोदर पूर्व सूचना देण्यात आली. समुद्रात असलेल्या जहाजांना तटरक्षक दलातर्फे स्थानिक भाषेत सूचना दिली गेली होती. १३ जहाजांद्वारे १,६७८ जहाजांना सूचना देण्यात आली व ४४ व्यक्तींचे प्राण वाचविण्यात यश आले. यामध्ये २३ विमानांनी सहभाग घेतला होता.
३३० जणांचे प्राण वाचविले
खवळलेल्या समुद्रात एका बोटीतून समुद्रात खाली पडलेल्या व जीवरक्षक जॅकेट परिधान केलेले नसताना तब्बल १३ तास बचावलेल्या व केवळ डोके दिसत असलेल्या व्यक्तीला तटरक्षक दलाच्या सावित्रीबाई फुले जहाजातील कर्मचाऱ्यांनी नुकतेच वाचविले. जानेवारी, २०१९ पासून आजपर्यंत तटरक्षक दलाने ३३० जणांचे प्राण वाचविले आहे.