Join us  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:18 PM

महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते विधान भवनात उपस्थित; मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेदेखील हजर

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला आहे. ठाकरेंनी थोड्याच वेळापूर्वी विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दुसरे ठाकरे ठरले आहेत. त्याआधी आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंनी कधीही  निवडणूक लढवलेली नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे निवडणूक लढवणारे शिवसेनेचे पहिले पक्ष प्रमुख ठरले आहेत.विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीनं ५, तर भाजपानं ४ जणांना उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी उमेदवारी अर्ज भरला. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीनंतर काँग्रेसनं विधान परिषदेची एकच जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ जणांची निवड बिनविरोध होणार, हे स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: या निवडणुकीत उमेदवार आहेत. सध्या आपण कोरोनाचा मुकाबला करत आहोत, अशा परिस्थितीत निवडणूक बिनविरोध व्हायला हवी म्हणून काँग्रेस एकच जागा लढवेल, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केलं.काँग्रेस दुसरी जागा लढणार असेल तर आम्हीही पाचवी जागा लढवू, अशी भूमिका घेत भाजपने उमेदवारी अर्ज तयार ठेवला होता. मात्र काँग्रेसनं एकच जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यानं काँग्रेसनं पाचवी जागा लढवणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे आता भाजपचे ४, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल.काँग्रेसने राजेश राठोड आणि राजकिशोर (पापा) मोदी या दोन उमेदवारांची घोषणा शनिवारी केली होती. मात्र आता फक्त राजेश राठोड हेच काँग्रेसचे उमेदवार असतील. त्यांच्या नावाची घोषणा अखिल भारतीय काँग्रेसने आधीच केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपानं रणजीतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछेडे आणि प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली आहे....म्हणून जवान मोठ्या संख्येनं सोडताहेत हवाई दल; सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर गिलगिट-बाल्टिस्‍तानवर भारताच्या 'मास्‍टरस्‍ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावाड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

टॅग्स :उद्धव ठाकरेविधान परिषद निवडणूकआदित्य ठाकरे