Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राज्यात शिवसेनेच्या चाललेल्या गुंडाराजवर मुख्यमंत्र्यांचं लक्ष असायला हवं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 19:10 IST

शिवसेना सध्या संजय राऊत-कंगना राणौत आणि इतर वादग्रस्त घटनांमुळे चांगलीच चर्चेत आहे. कंगनाचा वाद शमल्याचे दिसत असतानाच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं एक व्यंगचित्र शेअर केल्यानं शिवसैनिकांनी नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला मारहाण केली.

ठळक मुद्देबिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा बिहार दौरा सुरू असून महाराष्ट्रातील विविध विषयांवर फडणवीस यांनी तेथील माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई - निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारल्यानंतर आता या मुद्द्यावरुन भाजपाने शिवसेनेची कोंडी करण्याचं ठरवलं आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे धोरण असल्याचं शिवसेना नेते व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रक काढून म्हटलं होतं. त्यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला होता. तर, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. 

शिवसेना सध्या संजय राऊत-कंगना राणौत आणि इतर वादग्रस्त घटनांमुळे चांगलीच चर्चेत आहे. कंगनाचा वाद शमल्याचे दिसत असतानाच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं एक व्यंगचित्र शेअर केल्यानं शिवसैनिकांनी नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसैनिकांच्या मारहाणीत जखमी झालेले नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मांनी यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर त्यांनी त्वरित त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असं शर्मा म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या सर्व कार्यकर्त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. त्यानंतर, आता देवेंद फडणवीस यांनीही यावरुन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा बिहार दौरा सुरू असून महाराष्ट्रातील विविध विषयांवर फडणवीस यांनी तेथील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, महाराष्ट्र हे देशातील सर्वात बाधित कोरोना राज्य असून राज्यातील मृत्यूदरही देशात सर्वात जास्त असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, कंगना राणौत व शिवसेना वादात निवृत्त नेव्हल अधिकाऱ्याला झालेली मारहाणही त्यांनी गुंडाराज असल्याचं म्हटलं. राज्यात शिवसेनेकडून सुरु असलेल्या गुंडाराजवर मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, कंगना सोडून कोरोनावर लक्ष द्यावं, असंही फडणवीस यांनी म्हटलं. 

आशिष शेलार यांची टीका

आमदार आशिष शेलार यांनीही ट्विट करुन म्हटलं आहे की, वडाळ्याच्या हिरामणी तिवारीचे मुंडन, ठाण्यात कर्तव्यावरील महिला पोलिसांवर हल्ला, आता निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांना मारहाण, पक्षाची भूमिका काय? तर म्हणे,  संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, पण, “इथे कायद्याचे राज्य” आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे? असा टोला त्यांनी शिवसेनाला लगावला आहे.

आठवलेंनी घेतली भेट

भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. रामदास आठवले यांनी मदन शर्मा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच, शर्मा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्याची मागणी करणार असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे. आठवलेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचा फोटो शेअर केला आहे. 

संरक्षणमंत्र्यांचा ठाकरे सरकारला स्पष्ट इशारा

नौदलातील माजी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीवरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दांत सिंह यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं होतं. सिंह यांनी मदन शर्मा यांच्याशी संवादही साधला आहे. 'माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी सैनिकांवरील अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह असून ते कदापि खपवून घेतले जाणार नाहीत, असं राजनाथ सिंह म्हणाले.

टॅग्स :शिवसेनाकोरोना वायरस बातम्यामुंबईदेवेंद्र फडणवीसकंगना राणौत