“महाराष्ट्र थांबणार नाही, अधिक गतिमान-समृद्ध, शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणार”: CM फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 12:08 IST2026-01-26T12:07:15+5:302026-01-26T12:08:15+5:30
CM Devendra Fadnavis Republic Day 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

“महाराष्ट्र थांबणार नाही, अधिक गतिमान-समृद्ध, शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणार”: CM फडणवीस
CM Devendra Fadnavis Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. प्रजासत्ताक आणि लोकशाही चिरायु होवो. जगातील सर्वोत्तम संविधान आपल्याला लाभले असून बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान निर्मिती समितीला आपण मानवंदना अर्पण करतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर देशाची प्रगती उभी आहे. महाराष्ट्र थांबणार नाही. आपल्या संविधानाने दिलेल्या व्यवस्थेच्या बळावर राज्य अधिक गतिमान आणि समृद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमानाने राष्ट्र ध्वजवंदन केले.
पुढच्या टप्प्यात दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा सरकारचा ठाम प्रयत्न राहणार आहे. देश वेगाने प्रगती करत आहे. भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून काम करत असून राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. दावोस येथे ३० लाख कोटींचे करार झाले असल्याचे सांगत राज्यातील सर्व भाग विकास प्रक्रियेत सहभागी होत आहे. यामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सर्वसामान्यांना निवाऱ्याचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू
सर्वसामान्यांना निवाऱ्याचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना, शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उपक्रम, तसेच मोफत वीज योजनेसारख्या निर्णयांमधून समाजातील विविध घटकांचा सर्वांगीण विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकरी हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदु असून, शेतीला पाणी, वीज आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्याने धोरणात्मक निर्णय घेत आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने जलसंधारण, सिंचन आणि पाणी व्यवस्थापनावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत. तसेच समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत, असेही फडणवीस यांनी नमूद केले.