Join us  

शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार; उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनी केला निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 3:12 PM

शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे.

मुंबई: शिवसेनेने विचारधारा बदलली नाही आणि शिवसेना कुणापुढे लाचारही होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुखउद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली. शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. 

शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला, तो मोडीत काढण्यासाठीच मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. 'प्राण जाय पर वचन न जाये' ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुखसुद्धा लाचार होणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

उद्धव ठाकरे या बैठकीत पुढे म्हणाले की, मला काही जण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहेत, पण शिवसेना एक वादळ आहे आणि शिवसैनिक हे कवच आहेत. शिवसैनिकांचं कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा आहे.मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्यासोबत संपर्क कमी झाला असला तरी मी नात्यात अंतर पडू देणार नाही. त्याचप्रमाणे भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनी केला आहे.

देशावर चीन नावाचं संकट आहे. त्यासाठी संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक आहे. हिमालयाच्या संकटालासुद्धा महाराष्ट्राचा सह्याद्री लागतो, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. तसेच तुमच्यासारखा शिवसैनिक माझ्यासोबत जोपर्यंत आहे मला कशाचीही भीती नाही. सर्वांनी नेहमी अशीच साथ शिवसेनेला देण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार