मुंबई - देशभरात गणेशोत्सवाच्या आगमनाचा उत्साह असून राज्यात सर्वत्र धूम पाहायला मिळत आहे. वाजत-गाजत आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात लाडक्या बाप्पाचे घराघरात स्वागत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या वर्षा बंगल्यात गणरायाचे थाटामाटात आगमन केले. त्यानंतर विधीव्रत पूजा करुन देवाला महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी साकडे घातले.
गेल्या कित्येक दिवसांपासून ओढ लागलेल्या गणपती बाप्पाचे आज घरोघरी आगमन झाले आहे. गावागावात, घराघरात आणि प्रत्येक गणेश मंडळात गणपती बाप्पा विराजमान झाले. सवाद्य मिरवणुकीसह मुहूर्तावर गणरायाची प्राण-प्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर, सुखकर्ता-दु:खहर्ता या आरतीने गणरायाची विधीवत पूजाही झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्नी अमृता, मुलगी देविजा आणि कुटुंबातील सदस्यांसह आपल्या मुंबईतील वर्षा बंगल्यात बाप्पाची पूजा केली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यानी ट्विट करुन जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.