Join us  

मुंबई पोलिसांसाठी सलमानकडून 'ही' मदत, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 2:55 PM

देशात लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे रोजगारही थांबला आहे. अशात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे

मुंबई - कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली असून पोलीस व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे कुटुंब चिंताग्रस्त आहे. आता, लॉकडाउनचा चौथा टप्पा अवलंबण्यात आला असून पाचवा टप्पाही सुरु होण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेष म्हणजे हजारांपेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पोलिसाच्या आरोग्याची काळजी म्हणून अभिनेता सलमान खानने १ लाख सॅनिटाझर बॉटलचा पुरवठा मुंबई पोलिसांना केला आहे. 

देशात लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे रोजगारही थांबला आहे. अशात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दंगबस्टार सलमानने आपली जबाबदारी ओळखून यापूर्वी बॉलिवूड इंडस्ट्रीतील २५ हजार कामगारांना मदत केली होती. या कामगारांना काम नसतानाही वेतन देण्याचं काम सलमानने केले. त्यानंतर, मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी सलमान पुढे आला आहे. आपल्या बिईंग ह्युमन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सलमानने १ लाख सॅनिटायझरच्या बाटल्या मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलमानच्या या मदतीबद्दल ट्विटरवरुन त्याचे आभार मानले आहेत. 

आपल्या मुंबई पोलिसांनी केलेल्या मदतीबद्दल सलमान तुझे आभार, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटरवरुन म्हटले आहे. 

दरम्यान, राज्यातील गुरुवारी पहाटे ४ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत २२ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. यात मुंबईतील १३ पोलिसांचा समावेश आहे. २३६ अधिकारी, १,८५९ अंमलदार मिळून एकूण २,०९५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ८७९ उपचाराअंती बरे झाले आहेत. यात ७५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

लॉकडाउनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी, रुग्णालयांबाहेरील बंदोबस्त, कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यास नातेवाइकांच्या जबाबांसह तपशिलांची नोंदणी, बेवारस मृतदेहांवरील अंत्यसंस्कार, मास्क न लावता बाहेर भटकणाऱ्यांची धरपकड, अशी सर्व जबाबदारी पोलिसांवर आहे. याशिवाय स्थलांतरित मजुरांच्या नोंदणीपासून पाठवणीपर्यंतची प्रक्रियाही त्यांच्याकडूनच पूर्ण केली जात आहे. त्यातच आता केंद्राच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय साहाय्य योजनेंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या विस्थापितांना शोधण्याची जबाबदारीही पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पोलीसांमध्ये कोरोनाबाधिक होण्याचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे.  

टॅग्स :सलमान खानउद्धव ठाकरेमुंबई