मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 07:06 IST2025-10-29T07:05:38+5:302025-10-29T07:06:14+5:30
एम पश्चिम विभागात ३० नोव्हेंबरपर्यंत मोहीम

मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
मुंबई : जनगणना-२०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून जनगणना संचालनालयाकडून पूर्वचाचणी घेण्यात येणार आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची म्हणजे घर यादी व घर गणनेची पूर्वचाचणी १० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाईल. तसेच स्व-गणना करण्याचा पर्याय देखील १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पूर्व चाचणीसाठी इतर जिल्ह्यांसह मुंबईची निवड करण्यात आली असून, एम पश्चिम प्रभागामध्ये जनगणना पूर्वचाचणी पार पडणार आहे.
जनगणना पूर्व चाचणीच्या अनुषंगाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची जनगणना संचालनालयाच्या संचालक, डॉ. निरूपमा जे. डांगे यांनी मंगळवारी भेट घेतली. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा उपस्थित होते. राज्यातील घर यादी व घरगणनेची पूर्वचाचणी निवडक तीन नमुना क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे.
पूर्व चाचणीकरिता निवडलेल्या नमुना क्षेत्रांमध्ये मुंबई पालिकेच्या एम/पश्चिम प्रभागातील १३५ घर यादी गट, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसील येथील २६ गावे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तहसील येथील ४५ गावे यांचा समावेश आहे. या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या जनगणना पूर्वचाचणीसाठी जनगणना अधिनियम, १९४८ च्या तरतुदी लागू राहतील. पूर्वचाचणीच्या अनुषंगाने राज्यात ४०२ प्रगणक आणि पर्यवेक्षकांचा गट कार्यरत असणार आहे.
एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान पहिला टप्पा
केंद्र शासनाने सन २०२७ मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय आधीच अधिसूचित केला आहे. जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घरयादी व घरगणना (टप्पा-१) हा एप्रिल ते सप्टेंबर, २०२६ या दरम्यान एका महिन्याच्या कालावधीत पार पडेल.
लोकसंख्या गणना (टप्पा-२) फेब्रुवारी २०२७ मध्ये पार पडेल. जनगणना ही जनगणना अधिनियम, १९४८ च्या तरतुदीनुसार केली जाते. त्यामुळे निवडक नमूना क्षेत्रातील सर्व उत्तरदाता व सर्वसामान्य नागरिकांना जनगणनेकरिता नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक, जे माहिती संकलनासाठी वाटप केलेल्या क्षेत्रातील घरे व कुटुंबाना भेट देतील, त्यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.