...आता खरी कसोटी, मतदान व्यवस्थापनाची! प्रचार थांबला तरी मतदानापर्यंत नेतेमंडळीची होणार दमछाकच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 06:38 IST2026-01-14T06:38:19+5:302026-01-14T06:38:19+5:30
गाठीभेटींवर राहणार भर

...आता खरी कसोटी, मतदान व्यवस्थापनाची! प्रचार थांबला तरी मतदानापर्यंत नेतेमंडळीची होणार दमछाकच
मुंबई : राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी महापालिका निवडणूक प्रचारासाठी प्रचंड मेहनत घेतली. आता प्रचार संपला असताना १५ जानेवारीपर्यंत सगळेच नेते लक्ष केंद्रित करतील ते मतदानाच्या व्यवस्थापनावर. 'आपल्या' मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान प्रत्येक पक्षासमोर असेल.
आपापल्या प्रभावपट्ट्यात तसेच आपल्या समर्थक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठीची यंत्रणा आता सक्रिय झाली आहे. वैयक्तिक गाठीभेटींवर प्रत्येक पक्षाचे नेते भर देत आहेत. यावेळी महायुती वा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढल्याचे चित्र क्वचितच बघायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत तीन पक्षांविरूद्ध तीन पक्ष असे चित्र होते, ते यावेळी पार बदलले असून, नवीनच समीकरणे उदयास आली. या बदललेल्या समीकरणांतही आपापल्या पक्षाला मोठे यश मिळवून देण्याचे आव्हान सर्व प्रमुख नेत्यांसमोर आहे.
प्रचाराचा धुरळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण ७७ इव्हेंट केले. त्यात ३७ सभा आणि रोड शोंचा समावेश होता. मुंबईत सात, नागपुरात पाच, तर पुण्यात दोन आणि अन्य प्रत्येक महापालिकेत एक सभा वा अन्य इव्हेंट असे त्यांच्या प्रचाराचे स्वरुप होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ रोड शो केले. २० जाहीर सभा घेतल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ३५ प्रचारसभा घेतल्या. २५ प्रचार रॅली काढल्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईचे शिवाजी पार्क, ठाणे आणि नाशिकमध्ये संयुक्त सभा घेतल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ३० प्रचार रॅली आणि २३ जाहीर सभा घेतल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी ३ चिंचवडवर लक्ष केंद्रित करताना राज्याच्या अन्य काही महापालिकांत सभा घेतल्या व रोड शो केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते खा. असदुद्दिन ओवैसी यांनीही सभांचा धडाका लावला.