मुंबई : देशासह राज्य, मुंबईला थंडीची चाहूल लागली असून, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरला. १ नोव्हेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान २१ अंश नोंदविण्यात आले असून, पवई आणि बोरीवलीसह उपनगरात बहुतांश ठिकाणी किमान तापमान २० अंशांखाली नोंदविण्यात आले. दुसरीकडे ऑक्टोबर सरतानाच श्रीनगरचे किमान तापमान ०.१ ते ०.२ अंश नोंदविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या उत्तरार्धापर्यंत श्रीनगरचे किमान तापमान खाली उतरत नाही.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, ऑक्टोबरमधील पावसाचा विचार करता मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पुण्यात सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. त्या मानाने विदर्भात कमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर आता मुंबईसह राज्याला थंडीची चाहूल लागली आहे.मुंबईच्या किमान तापमानात घसरण नोंदविण्यात येत असून मुंबईसह राज्यात पारा बऱ्यापैकी खाली येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
आला थंडीचा महिना; नाेव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी गारवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 01:37 IST