मुंबईतील इमारती, चाळी, झोपडपट्टी प्रतिबंधमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 23:07 IST2022-02-11T23:07:24+5:302022-02-11T23:07:41+5:30
कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासनाने एप्रिल २०२० पासून चाळी, झोपडपट्टी व इमारती सील करण्यास सुरुवात केल्या होत्या.

मुंबईतील इमारती, चाळी, झोपडपट्टी प्रतिबंधमुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - मार्च २०२० पासून मुंबईतील चाळी, झोपडपट्टी आणि इमारतींमध्ये शिरकाव करणाऱ्या कोरोना आता पूर्णपणे हद्दपार झाला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर मुंबईतील सर्व इमारती प्रतिबंधमुक्त झाल्या आहेत.
कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासनाने एप्रिल २०२० पासून चाळी, झोपडपट्टी व इमारती सील करण्यास सुरुवात केल्या. पहिल्या लाटेदरम्यान महापालिकेने हाती घेतलेल्या उपाययोजनांमुळे चाळी व झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला. मात्र दुसऱ्या लाटेवेळी इमरतींमध्ये संसर्ग वाढला. त्यामुळे महापालिकेने नियमात बदल करीत बाधित रुग्ण सापडलेल्या इमारतींचे मजले सील करण्यास सुरुवात केली.
दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आला, तरी इमारती प्रतिबंधित होण्याचे प्रमाण अधिक होते. डिसेंबर २०२१ मध्ये पुन्हा कोविडची तिसरी लाट फैलावू लागली, त्यावेळी इमारतींमध्येच बाधित रुग्ण अधिक सापडू लागले. या काळात दोन हजारांहून अधिक मजले सील तर प्रतिबंधित इमरतींची संख्या देखील वाढली. त्यामुळे नियमावलीत सुधारणा करीत २० टक्के घरांमध्ये किंवा किमान १० रुग्ण असल्यास इमारती सील करण्यास सुरुवात केली. मात्र महिन्याभरातच तिसरी लाट आटोक्यात आल्याने आता केवळ तीन हजार २१९ सक्रिय रुग्ण आहेत. तर शुक्रवारपर्यंत शेवटच्या दोन इमारतीही सीलमुक्त झाल्या आहेत.
* मुंबईत मार्च २०२० पासून आतापर्यंत ६६ हजार ३३६ इमारती तर २७९८ चाळी व झोपडपट्टी प्रतिबंधमुक्त झाल्या आहेत.