मुंबईत शिंदेसेनेची पीछेहाट, शिंदेंच्या शिलेदारांना सुषमा अंधारेंनी डिवचले, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 21:19 IST2026-01-16T21:16:57+5:302026-01-16T21:19:27+5:30
BMC Elections Result 2026: अत्यंत अटीतटीच्या झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने बहुमत मिळवलं आहे. मात्र आज जाहीर झासेल्या निकालांमध्ये मुंबईत उद्धवसेना ही शिंदेसेनेला वरचढ ठरली आहे. त्यानंतर आता उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदेसेनेला डिवचले आहे.

मुंबईत शिंदेसेनेची पीछेहाट, शिंदेंच्या शिलेदारांना सुषमा अंधारेंनी डिवचले, म्हणाल्या...
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने बहुमत मिळवलं आहे. मात्र आज जाहीर झासेल्या निकालांमध्ये मुंबईत उद्धवसेना ही शिंदेसेनेला वरचढ ठरली आहे. उद्धवसेनेने सुमारे ६५ जागा जिंकल्या आहेत. तर शिंदेसेनेला केवळ २८ जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर आता उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदेसेनेला डिवचले आहे.
याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या की, ठाकरेंकडून शिंदेसेना किंवा भाजपमध्ये कोणाचाही प्रवेश झाला की, ठाकरेंना धक्का ठाकरे ना धक्का अशा बातम्या यायच्या. पण आजचे निकाल बघता ठाकरेंच्या जीवावर गले लठ्ठ झालेले नेते जरी सोडून गेले असले तरी सर्वसामान्य शिवसैनिकांनी जीवाचं रान करून पुन्हा ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला आहे.
सदा सरवणकरांची दोन्ही मुलं रवींद्र वायकरांची मुलगी राहुल शेवाळेंची भावजय यांचे दारुण पराभव बघता त्यांच्या जाण्याने ठाकरेंना फार फरक पडलेला नाही हे स्पष्ट होते, असे अंधारे म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, आपण मशालीवर निवडणूक लढलो. मुंबईकरांनी धनुष्यबाण नाकारला आणि मशाल स्वीकारली याचा अर्थ चिन्ह धनुष्यबाण असो की मशाल असो चिन्ह ठाकरें कडून आलेल आहे का हे जास्त महत्त्वाचं ठरलं.
भाजपाने "फोडा आणि राज्य करा" असे म्हणत शिंदेंना वेगळे केले. शिंदे आणि ठाकरे जर एकत्र लढले असते तर आता भाजपला पळता भुई थोडी झाली असती. भाजपने कितीही आपटले तरी काँग्रेस आणि इतर यांना मिळालेल्या जागा बघता भाजपला अजिबात निर्विवाद यश मिळालेले नाही, असेही अंधारे यांनी नमूद केले. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपने अजित दादांसोबत केले आहे. दोन पवारांच्या भांडणाचा लाभ भाजपाने उचलला. शिंदे आणि अजित दादा यांना ज्या दिवशी हे कटू सत्य उमगेल तो सुदिन समजावा, असा टोलाही त्यांनी लगावला.